मनोगत


    लिहीत होतेच. "विपुल श्री, माहेर, स्त्री, किस्त्रीम, उत्तम कथा, प्रपंच" अशा अनेक मासिकातून कथा छापून आल्या होत्या. त्यानंतर काही काळ ते सगळंच थांबलं. म्हणजे अनेक घटना घडत होत्या, लिहिण्याच्या पलीकडे नेणारे आयुष्यातले अनुभव येत होते. मग उर्मी यायची, शब्द फुटायचे, पण कागदावर उतरवण्या आधी विरघळून जायचे. एक दिवस तेजसने प्रेमाचा आग्रह करून त्याचा टॅब माझ्या हातात अक्षरशः कोंबला आणि म्हणाला "आत्या आता तू पुन्हा लिहायला सुरुवात कर बघू" आणि मग तिथून लिहायची पुनःश्च सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात लॉकडाउन सुरू झाला. वनिता पटवर्धन, ज्या ज्ञान प्रबोधिनी च्या मानस शास्त्र विभागाच्या प्रमुख (माजी) त्यांनीही प्रेमळ आग्रह केला त्यामुळे तीन महिन्यात खूप लेखन केले. अनुराधा गोडबोले आणि सुरेखा वडास्कर या दोन घनिष्ठ मैत्रिणींनी ब्लॉग सुरू कर असे बजावले. शेवटी शेजारची आश्लेषा मदतीला धावून आली, मला न जमणाऱ्या अनेक गोष्टी तिने शिकवल्या, तासनतास बसून तिने मदत केली आणि आता ब्लॉग सुरू करते आहे. या ब्लॉगसाठी अदिती कोटलीकर ने सुंदर लोगो तयार करून दिला.

जाता जाता एवढं कबूल करतेच की "मराठी साहित्य क्षेत्र" अफाट आहे, ते माझ्या न लिहिण्याने मुळीच ओस पडणार नाही आणि अनेक मोठ्या मोठ्या लेखकांच्या पंक्तीत उष्टे खरकटे सुद्धा काढायची आपली पात्रता नाही. तरीही लिहायची आसक्ती शांत बसू देत नाही. आणि जे काही थोडे बहुत लिहीले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळेच हा "ब्लॉग प्रपंच"...


No comments:

Post a Comment