Aug 24, 2020

मोदक का सातवा नारळ

श्री सरस्वती प्रसन्न
         *मोदक का सातवा नारळ*

लग्न झाल्यानंतरचा पहिलाच गणपती
माझ्या माहेरी गणपती बसवायची प्रथा नाही
त्यामुळे मी, य-एकसायटेड.
सगळे एकत्र मिळून धम्माल आणि उकडीचे मोदक या दोन गोष्टींसाठी मी एखादी कॅज्युअल-लीव्ह सुद्धा कुर्बान करायला तयार होते.
“आमच्याकडे एकत्र असतो गणपती,सख्ख-चुलत असलं काही नाही हो” हे वाक्य गणपतीचे ओपनिंग स्टेटमेंट होतं.
आदल्या रात्री चुलत घरी मदतीला जायचे होते
“आमच्याकडे साडी नेसतात हं का!”
मी निमूटपणे साडी नेसले
त्या घरी,वक्रतुंड आगमनाची तयारी,महाकाय पातेल्यापासून सुरू झाली होती
हजारोंच्या संख्येने,मोड आलेल्या डाळिंब्या अहिल्या-प्रतीक्षेत,आमच्या हस्तस्पर्शाने उद्धार व्हायची वाट पाहात होत्या.
“सर्वांनी घेऊ म्हणजे होतील पटपट.आहे काय त्यात?”
या वाक्यानंतर, तिसऱ्या चहाची राऊंड प्यायलेली,समस्त पुरुष मंडळी एकेक करून निसटली!
दोन चार आज्ञाधारक सुना आणि एक दोन सासवा, बसल्या सोलायला!!!!!

ते काम परवडलं,असं दुसरं काम, आज्ञाधारक सुनांची वाट पाहात होतं.

सात नारळ आणि कोयता अशी मोदकांची भक्कम तयारी ठेवलेली होती.
एका दिराने सातही नारळ फोडायचे सत्कृत्य केलं , त्याचं पाणी,
हरताळकेचा कडक उपास असलेल्या आम्हाला प्यायला देऊन तो अदृश्य झाला.
त्या नारळपाण्याच्या बदल्यात सात दुणे चवदा वाट्या खरवडायच्या होत्या!
डाळिंब्या सोलायचा कंटाळा म्हटलं तर नारळवाट्या आ वासून बसलेल्याच होत्या.
मी आपलं हळूच म्हटलं”एवढ्या डाळिंब्या कोण खाणार? उद्या बटाट्याची भाजी सुद्धा आहे ना?”
“नुसती बटाट्याची भाजी कशी खायची???.किती वातूळ होईल? इति एक सासू.
मी मनात म्हटलं “यांच्याकडच्या डाळिंब्या विना-वात आहेत की काय? असतीलही!!” पण त्या सोलून सोलून आम्हा सुनांना मात्र वात आला होता हे नक्की!!!
अखेर दीड तासाच्या हातघाई(की बोट-घाई) नंतर,गोऱ्या गोऱ्या डाळिंब्या पोटात घेऊन एक भक्कम स्टीलचा डबा,फ्रीजमध्ये रवाना झाला!
एव्हाना कडक उपासाने डोकं कलकलायला लागलं होतं.
पण भुकेल्या पोटानि,कलकलत्या डोक्यानि आणि डाळिंब्या सोलून सोलून हुळहुळ्या झालेल्या बोटांनी,नारळ खरवडायचे बाकी होतच.
आम्ही दोन नवीन सुना बसलो खरवडायला.
मला माहेरी नारळ खरवडायची अजिबातच सवय नव्हती.त्यामुळे माझे हात भरून आले होते.
खरवडून झालेल्या वाट्या मी बाजूला ठेवल्या होत्या.
त्या हातात घेऊन त्या वाट्यांच्या अंगाला चिकटून असलेल्या पातळ थराकडे पाहात ,चुलत सासूबाई म्हणाल्या”अग हिने बघ कशी खरवडलीये वाटी? अग हे खोबरं टाकायचं नाही, चमच्याने खरवडून काढायचं !!”
मोदकाच्या सारणासाठी,गोरं गोरंच खोबरं हवं,जरासुद्धा सावळ खोबरं आलं नाही पाहिजे असं आमच्या सासूबाई बजावून गेल्या होत्या
(सुनेच्या आणि मोदकाच्या-खोबऱ्याच्या रंगाची अट एकच होती, *लख्ख गोरेपणाची* ) …..आली का पंचाईत?
बरं चुलत सासूला नक्की काय सांगू असा प्रश्न पडायच्या आतच त्या म्हणाल्या “अग हे असं चमच्याच्या धारीने खरवडून घ्यायचं आणि चटणीसाठी वापरायचं हो!आमच्याकडे  आम्ही काहीही फुकट घालवत नाही”
पुन्हा तेच *“आमच्याकडे”?????*

सहावा नारळ खरवडून झाला तेव्हा वाटलं आता बस झालं. 
मी आणि माझ्याच वयाची जाऊ,आम्ही एकमेकींना डोळ्यांनी खुणावत आहोत हे 
समस्त सासवानी पाहिलं,आणि *उशाप* देत म्हणाल्या”ठीक आहे सहा नारळाचं सारण पुरेल!!! 
नाही खरवडलात तो सातवा नारळ तरी चालेल”
इतक्यात तिथे आमच्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या"माझ्या मते सातवा नारळ सुद्धा खरवडून ठेऊ देत.आपल्याकडे तेवढे मोदक लागणारच आहेत"
"काही गरज नाही,हवे तेवढे होतील याचे मोदक। आणि  एक सांगू का हल्ली आपल्याकडे पूर्वी सारखं कुणी खात  नाही हो.
आमचे हे पहा ना,हल्ली पथ्य पाळायला लागल्यापासून अगदीच बेताबेताने खातात. 
आणि त्यातून कमी पडले तर आपण बायकांच्या शेवटच्या पंक्तीत करू ऍडजस्ट" इति चुलत सासूबाई.
*या शेवटच्या वाक्याला माझ्या मनात कळ उठली.*
का म्हणून ऍडजस्ट करायचं आपण? असा *पोट* तिडीक विचार मनात येऊन गेला.
शेवटी सहा नारळावर एकमत झाले!!
आणि आम्हा दोघींची सुटका झाली.
विळीवरून उठताना पाय आणि हातसुद्धा भरून आले होते.

पोटातले उसळी मारणारे पाचक रस एव्हाना, खाली सेटल झाले होते!
भूक मेल्यानंतर ,ती खरतर मेलेली नसतेच,ती डोक्यात *पित्त-रूपाने* अमर झालेली असते!!!
आता सारणाचा कार्यक्रम होता.
“ढवळत रहा गं, जरासुद्धा खाली लागता कामा नये.”
ही सूचना शिरोधार्य मानून ढवळत होते,एकीकडे वेलचीची पूड काढून ती त्यात घालणार
इतक्यात कुठूनतरी आमच्या सासूबाई
 प्रगट झाल्या.थाम्ब थाम्ब थाम्ब...
“आधी नाही घालायची वेलची.वास कमी होतो त्याचा!
सगळ्यात शेवटी घाल म्हणजे वास जास्ती लागेल आणि कमी घालूनही पुरेल”
मी मनातल्या मनात हात जोडले!!
(कोपरापासून)!!!!!!
सहा नारळाच्या सारणाला अर्धा तास लागला!!
आता, बाप्पाना आणायला जायचे होते.बाजूच्याच वाडीत जायचे होते.
बाप्पांना वाजतगाजत आणून,
देव्हाऱ्यासमोर बसवलं. 

खूप गोंडस गोड मूर्ती होती.
तिच्यापुढे मनोभावे हात जोडून,
आम्ही एकदाचे घरी जायला निघालो.

उद्या जरा आरामात उठेन,हा विचार मनात यायला आणि कानावर चुलत सासूचे वाक्य पडायला एकच गाठ होती.
”उद्या पहाटे उठून लवकर या बरं का.
मी साबुदाणे घालतेयभिजत.सर्वांनी
नाश्त्यालाच या”
उद्याच्या साबुदाणा खिचडीच्या कल्पनेने मला *बिरबलाच्या खिचडीसारखा* आधार मिळाला होता!
*त्याच चिंतनात* मला गाढ झोप लागली!
पहाटे उठले तेव्हा,डोक्यातलं पित्त *रिव्हर्स* होऊन पुन्हा पोटात उसळ्या मारत होतं.
आन्हिके उरकून ,पुन्हा एकदा *“आमच्याकडे साडी नेसतात”* तशी साडी नेसून,आम्हा सासवा,
सुनांची जोडी निघाली त्या घरी...

खिचडीची तयारी चालूच होती.
पुन्हा एका महाकाय कढईत तीन गलेलठ्ठ बटाट्याच्या फोडी, साजूकतुपात स्विमिंग करत होत्या.
तळून तळून त्या तेजस्वी सोनेरी झाल्यावर,चुलत सासूबाईंनी त्यावर साबुदाणा आणि पांढरं शुभ्र दाण्याचं कूट ढकललं.(“आमच्याकडे दाणे भाजताना फार जपून भाजायला लागतात हो,आमच्या ह्यांना पांढरं दाण्याचं कूट लागतं”,,हे वाक्य तर यांच्या फॅमिलीत *अजरामर* आहे)

खमंग वास दरवळला होता.
एकीकडे चहाचं आधण चढलं होतं.

माझ्या आणि साबुदाणा खिचडीमध्ये आता फक्त काही क्षणांचं अंतर होतं.
इतक्यात चुलत सासूबाईंनी माझ्या हातात ट्रे दिला.
बाहेरच्या खोलीत बसलेल्या आम्हा हरतालकांच्या *कैलासपतीनि* चढाओढीने खिचडी खायला सुरवात केली!
त्यांच्या दोन राऊंडस झाल्यावर ताजा चहा!!!!!
यांच्या घरातल्या नाश्त्याच्या रमीचा सिक्वेन्स चहाशिवाय पूर्णच होत नाही!
मी ते प्रकरण आटोपून  लगबगीने कढाईपाशी आले तेव्हा साबुदाणा खिचडीने तळ गाठला होता.
आम्ही सगळ्याजणींनी ती खिचडी वाटून घेतली.
आता दोन लढाया होत्या!
एक स्वैपाकघरात आणि दुसरी बाहेर………..
बाहेर,गणपती पूजन प्लस गुरुजींची  तयारी प्लस कालची अर्धवट राहिलेली आरास!!
बाहेरचा माहोल मस्तच होता(फक्त पोटातला माहोल जरा गडबडला होता)
बागडणारी पिलावळ,
बाहेर काही गप्पा मारणारी आणि काही अर्ध ग्लानीत पेंगणारी(काम  नसलं की हमखास येते) दीर आणि सासरे वगैरे मंडळी,सासवांच्या गप्पा,
हलक्या आवाजातल्या *फॅमिली गॉसिपस!!*
पूजा संपन्न झाली आणि गुरुजी
(उत्तरपूजेच्या अक्षदा आजच देऊन) निघाले.
निघण्यापूर्वी त्यांच्यासाठी चहा टाकायचा होता.
“बाहेर विचार गं कुणाला हवाय का?”
विचारायचं काय,बाहेरचं उत्तर मला ठाऊकच होतं!!!
“घोट घोट चालेल आम्हाला
सगळ्यांनाच!”
ह्यांच्या फॅमिलीत,चहाला नाही म्हटलं तर चहाचा अपमान होईल, असा एक गैरसमज असावा!
सो…...,गुरुजींसोबत सर्व मंडळींचा(तिसरा) चहा झाला.
अकराच्या सुमाराला मोदकांची उकड काढायला घेतली!
त्या कामाचा चार्ज मात्र एका एक्स्पर्ट सासूबाईंनी घेतला!
मळताना,त्यांचे हात लालीलाल झाले होते.
तुकतुकीत,पांढराधोप, उकडीचा 
गोळा अगदी *राजस सुकुमार* 
दिसत होता!
परात भरून गेली होती त्या गुबगुबीत गोळ्याने
आंबेमोहोरी सुगंधाने माझ्या चित्तवृत्ति की काय असतात ना त्या फुलून गेल्या होत्या!
शंभर!!!!!!!!
बरोब्बर शंभर मोदक झाले होते!
दुपारचा दीड वाजला होता!
पहिली पंगत आम्ही वाढायला घेतली!

गप्पांचा फड आणि त्यासोबत, मोदक,डाळिंब्या,अळूची पातळभाजी,
बटाट्याची *लग्नी-भाजी*
हे सगळं आग्रह करून वाढताना माझ्या (नसलेल्या) स्थितप्रज्ञ वृत्तीला मोठे आवाहनच होते.
पहिल्या वाढपानंतर आग्रहाच्या फैरी झडू लागल्या.
बघता बघता मोदक फस्त होऊ लागले!
मला शोले आठवत होता…कितने आदमी थे????????
*आदमी बीस ऑर मोदक सौ!!!!!*
आता या बीस नि प्रत्येकी पाच उडवले तर माझ्यासारख्या कालियाला( वर्ण तोच आहे म्हणा)
*खाली-हात* जावं लागेल अशी भीती वाटायला लागली होती.

*हल्ली पूर्वीसारखं खात नाहीत हो*
अशा वर्णनातले,सगळे *गोळी ते इंजेक्शन* या वाटेवरचे प्रवासी , तुडुंब मोदक खात होते.

शेवटी आम्हाला बसायला दोन वाजून गेले होते.
माझी भुकेली नजर शोधकपणे मोदकांचा अंदाज घेत होती.
पंधरा मोदक आणि आठ बायका!!!!
मला थोडं तरी हुश्श झालं!!
आम्ही सुरवात केली!!
इतक्यात बाहेरून माझ्या नवऱ्याने आवाज दिला”काकू,माझे दोन मित्र संध्याकाळी दर्शनाला यायचेत ग,सात आठ मोदक शिल्लक ठेव जरा.”

आमच्या सासूबाई कौंतुकाने निथळत होत्या”हो हो ठेवणारे बाजूला.अहो त्याचे पंजाबी मित्र आहेत,त्यांना खूप आवडतात उकडीचे मोदक”

मी मनात कपाळाला हात लावत म्हटलं ,इथे या महाराष्ट्रीयन सुनेलाही खूप आवडतात मोदक.आणि ती कालपासून या मोदकांच्या आशेवर बसली आहे….
नाहीं म्हणायला,सासूबाई सोडून सगळ्याच बायकांची नजरानजर झालेली मी पहिली!!
त्याला प्रत्युत्तर म्हणून सासूबाई म्हणाल्या ,”तरी मी म्हणत होते ,तो सातवा नारळसुद्धा खरवडायला हवा होता!!”
"मी हल्ली गोड कमीच खाते असं म्हणत"
माझ्या अजूनहीं हुळहुळणाऱ्या बोटांनी,मोदकाला हातही न लावता,मी मुकाट्याने वातूळ बटाटा भाजी 
आणि ( बिन-वातूळ)डाळींब्या,भातासोबतखायला सुरवात केली…………

योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे

Aug 16, 2020

निर्णय

श्री सरस्वती प्रसन्न

              निर्णय

छोटं गाव,गावात कॉलेज,
शिकणारा मुलगा,मुलाची फी
फी साठी बाबा,बाबा त्रस्त,
बाबाचं पाकीट रिकामं!!!!
अक्षयच्या डोक्यात रिकामं पाकीट!!
गुरुजी झोपाळ्यावर,चिंतेच्या झुल्यात ,मागच्या वर्षीची डायरी गुरुजींच्या पुढ्यात!
श्रावण ते चातुर्मास बुकींग्स झालेली! आणि….आजची डायरी कोरी !!!
इतक्यात अक्षय आला,
त्याचा,वयाला न शोभणारा पोक्तपणा,अकालीच आलेला!
अभ्यासातलं शहाणपण आणि आयुष्यातलंही
वडलांच्या आर्थिक आणि भावनिक दोन्ही गणितांची उत्तरं शोधणारा.
“बाबा,फी कशी भरायची यावर्षी?” गुरुजींनी त्याची नजर टाळली.
बारावीचा त्याचा रिझल्ट आला तेव्हा त्यांनी देव्हाऱ्यात त्याची मार्कलिस्ट ठेवली होती.
“तू खूप शिकायचं आहेस,गावातल्या नव्या कॉलेजात तुझी अँडमिशन करणार!”असं वचनच दिलेलं!!

पाहिली दोन ,पैशाने सुरळीत गेलेली वर्षं!!अक्षयला अर्धी स्कॉलरशिप!!!!
देवळातल्या मानधनाची आणि संपूर्ण चातुर्मासातल्या दक्षिणांची टोटल केली की उरलेली फी भरता यायची!

पण मार्च पासून सगळं चित्रच बेरंगी झालंय.श्रावण चार दिवसांवर आलेला.
गुरुजी दिवसभर मोबाइलकडे टक लावून पहायचे.जरा आवाज झाला की एस.एम.एस चेक करायचे.

दरवर्षीची बांधलेली पन्नास एक घरं!!!धनवान,धर्मवान,दातृत्ववान यजमान!
धर्म आणि अर्थकारण दोन्ही साधत असे.
जूनपासून कॅलेंडर हातात घेऊन लोकं यायची,मनासारखा दिवस आणि वेळ ठरवायला!
लघुरुद्र,मंगळागौरी,झालंच तर वार्षिक सत्यनारायण हे ठरलेलं.
श्रावणीसोमवार तर अनकंट्रोलेबल असायचा.
पहिला लघुरुद्र पहाटे पाच,तिथून पुढे कमीतकमी दहा तरी असायचेच.
रात्री गुळण्या आणि हळद दूध याचा मारा घशावर!!!
श्रावण संपायच्या आतच भाद्रपदाचं बुकिंग!!!!
कित्येक घरच्या गणपती पूजा!!सगळ्याची नुसती रेलचेल.
उत्तम तांदूळ,केशरी पेढे-बर्फी, ताजी फळं, सुकामेवा,नारळ!!!!!!!
झोपाळ्यावरून ते उठले! कपाटातून कागदपत्रं काढली! 
बँकपासबुक्स एफ डी.,तशी सोय होईल फीची,पण........
त्याला हात लावायचा नाही असा बायकोचा आग्रह!
तिचं बरोबर आहे ,पुढच्या दृष्टीने सगळं पाहायला हवं ना.
दुखणी खुपणी,म्हातारपण,लेकीचं लग्न.जमलंच तर अजून मोठी जागा,
“बाबा, मी आमच्या प्रोफेसरशी बोलून थोडी मुदत मागून घेतली आहे!”

डोक्यात कल्पनांचं तांडव सुरू होतं.ऑनलाइन पूजा कुणीतरी सुचवली पण ते काही पटेना.

मास्क लावून पूजा सांगता येईल की…..,डिस्टन्स पाळायचं…….,आहे काय त्यात?
सरकारनं तेवढी *देऊळ बंदी* उठवावी, लोकं हळूहळू देवळात येतील आणि 
त्यांच्या डोळ्यासमोर मास्कधारी गुरुजी दिसले ना तरी पुढचं सगळं सोपं होईल.
इतक्यात फोन वाजला.अक्षरशः झडप घालून गुरुजींनी तो उचलला.

वैकुंठातल्या गुरुजींचा फोन होता.
“तुम्ही विचार केलात का?तुम्हाला दोन तीन आठवड्यापासून मी सांगतोय.
अहो दाहिनी बिघडायची वेळ आली इतकी संख्या वाढतेय.
तुम्ही माझं ऐका. क्रियाकर्म कुणी करायची ,कुणी नाही,हे नियम ठरवले कुणी?माणसांनीच ना?
आणि त्या माणसांसाठीच, त्यांच्या भावना जपण्यासाठी निदान मनुष्यधर्म पाळण्यासाठी इथे या”
कर्मसंकट मर्मसंकट धर्मसंकट सुद्धा.
फी भरली नाही तर लेकाच्या मर्मावर घाव.आणि जर तिथली कर्म केली तर कर्मसंकट,
कुठल्याही शुभकार्याला पौरोहित्य करण्यासाठी आमंत्रण यायचं नाही,असलं धर्मसंकट!
सगळी मंगलकार्य डोळ्यासमोर फेर धरून वाकुल्या दाखवत होती
लग्न,मुंज,वास्तुशांत,यज्ञ-याग,होम

आयुष्यभर लोकांच्यापत्रिकापाहिल्या.
स्वतःच्या पत्रिकेतला राहूकेतूयोग मात्र कळलाच नाही.
रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही!इतकी चित्रविचित्र स्वप्न पडत होती!
एकीकडे देव्हाऱ्यातली मार्कलिस्ट दिसत होती! दुसरीकडे निराश झालेला अक्षय दिसत होता.
शेवटी तर वैकुंठातली विद्युत दाहिनी आणि तिच्यासमोरच्या निष्प्राण रांगा दिसल्या!!
आणि…काळाच्या कोपऱ्यात लपलेली
 ती गोष्ट अचानक पुढे आली.

तीस वर्षांपूर्वीचा तो,अभ्यासात जेमतेम लक्ष!
हट्टाने दुकान घातलं,वडलांनी होतं नव्हतं ते सगळं त्यात ओतलं
पण अपयश आलं, दिवाळखोरी आली!घरात प्रचंड वादावादी!!!
जेमतेम विशीचा तो,डोक्यात राख घालून निघून गेला!
संतापून वैकुंठात जाऊन बसला. क्रियाकर्म करणाऱ्यांच्या दृष्टीस पडला.
शेवटी तिथलीच दीक्षा मिळाली! एक वर्षाचे *त्या विषयातले* रीतसर शिक्षण.
घरच्यांशी संपर्क तोडलेला.एका अंत्यसंस्काराच्या वेळी घरच्यांनी पाहिला,
आणि,हाय खाल्लेल्या,लेकाची वाट पाहणाऱ्या, आईसमोर नेऊन उभा केला.
मृत्यूपंथाला लागलेल्या आईने वचनात बांधून टाकलं.
एका वेदशास्त्रसंपन्न, दशग्रंथी विद्वानाला मध्ये घालून त्याचा रीतसर शुद्धीकरण विधी झाला...…….
काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या,बलिष्ठ, उदार असलेल्या महान धर्मात ती लवचिकता होतीच
त्यामुळे शुद्धीकरणविधीनंतर तो शुभकार्यांचे रीतसर पौरोहित्य करू लागला!!
आणि तो सगळा पूर्वेतिहास काळाच्या कुलुपात बंद झाला.
त्यांच्या स्वप्नात काळाच्या पडद्याआड लपलेली आठवणींची भुतं फेर धरू लागली .
आणि त्यांना दरदरून घाम फुटला.
ते दचकून जागे झाले तेव्हा पहाटेचे फक्त चार वाजले होते.
त्यांनी बाहेर अंदाज घेतला.मुलं गाढ झोपलेली.
मुलाच्या भाबड्या चेहेऱ्याकडे पाहून त्यांना गलबलून आलं आणि,गेला आठवडाभर चाललेला शंकांचा लपंडाव क्षणार्धात थांबला.
अवघड असला तरी तो निर्णय आज घ्यायचाच आणि बायकोच्या कानावर घालायचा.
तिचे वडील दशग्रंथी ब्राह्मण,
धर्म-शास्त्राचे प्रकांड पंडित!
तिच्या या कर्मकांडांबद्दलच्या कल्पना खूप कर्मठ! ती हे कसं स्वीकारेल???

स्वैपाकघरात त्यांनी विषय काढला!“यावेळची फी कशी भरायची मोठा प्रश्न आहे! 
सगळा चातुर्मास,कोरडा जाणार आहे.रोग वाढतंच चाललाय,एकाही यजमानाचा अद्याप साधा फोनही नाही!
लघुरुद्र,मंगळागौर,सत्यनारायण,
गणपती,काही काही नाही यंदा!!”
बायकोचा चेहेरा उग्र!!! “मला काही सांगू नका!फी कशी भरता येईल ते सांगा!
गुरुजी,जिभेवरचे ओठावर कसं आणाव या विवंचनेत.
“अहो बोला ना. मी माझे दागिने सुद्धा दिले असते.पण ते लेकीच्या लग्नासाठी........."
तिला मधेच तोडत गुरुजी म्हणाले “अजिबात नाही मोडायचे, 
मला एकच पर्याय दिसतोय,
तुला मी वैकुंठातली क्रियाकर्म केली तर चालेल का? त्यांना पुरोहिताची नितांत गरज आहे.
क्षणात बायकोचा चेहेरा पांढरटला!!
“अहो काय बोलताय काय?लोक काय म्हणतील?भलतंच काहीतरी!!!मला नाही चालणार अजिबात.”
“का?का नाही चालणार? आज तिथे क्रियाकर्म करणारे कमी पडतायत.
हजारो मृत्य दिवसागणिक होतायत. चेहेरासुध्दा पाहायला मिळत नाही मेलेल्या माणसाचा.
नातेवाईकांच्या मनाची तडफड चालू आहे. अंत्यविधीसाठीसुद्धा जवळ यायला धजत नाहीयेत माणसं.

 अशावेळी माझ्यासारख्यानी तिथे धार्मिक विधी केले तर लोकांचं हरवत चाललेलं मनोबल थोडंतरी वाढेल ना? स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधायचा आहे.
ज्या लोकलज्जेची तुला भीती आहे,ते लोक आपल्या अडचणीत उपयोगी पडणार आहेत का?”गुरुजी ठाम होते 
आणि बायको संतापाच्या आवेगात तडफडत होती…...
तिने शेवटचं अस्त्र काढलं “तुम्हाला तिथल्या क्रियाकर्म विधीचं शास्त्रशुद्ध ज्ञान तरी आहे का? ….....
तिला थांबवत वादाच्याआवेशात ते
अनेक वर्षांपूर्वीचा फ्लॅशबॅक,बोलून गेले!!
तिला प्रचंड धक्का!!
अनेकवर्षांपूर्वीचं,लपलेलं कठोर सत्य!
मग मात्र धरणीकंप झाला,तिच्या असहाययतेचा,संतापाचा..
 नवऱ्याने केलेल्या(?) प्रतारणेचा!!
ती धुसफुसत घुश्यात माहेरी निघाली,
पंचवीस वर्षांपूर्वीची प्रतारणा वडलांच्या कानावर घालायला!!

मुलं उठून बसली.पंचवीस वर्षांत न पाहिलेल्या दृष्याच्या शॉकमध्ये.. 
सात्विक पित्याने केलेली प्रतारणा??
रडत रडत निघून गेलेली आई पाहून दोघही सुन्नाळले ….
फी पलीकडचा कुठल्यातरी सत्याचा गुंता,मुलांना कोडं घालून गेलेला.
“बाबा, फी चा विषय राहुदेत.पण आई रडत का गेली ते मला सांगा?”
लॉकडाउनच्या फटफटीत सकाळी,
निष्प्राण रस्त्यावरून,निःशब्द तिघे,
तिच्यामागे निघाले!
ऐंशी पार केलेले,तेजपुंज,दशग्रंथी विद्वान आजोबा दोन नातवंडांना आणि विझून गेलेल्या त्यांच्या लेकीला गुंत्यातून अलगद सोडवत होते.
“कुठलंही काम श्रेष्ठ कनिष्ठ असूच शकत नाही. असताच कामा नये.काय रे,तुझ्या इंजिनीरिंगमध्ये असते का एखादीच ब्रांच सर्वश्रेष्ठ?कुठलाही धार्मिक विधी श्रेष्ठ कनिष्ठ असूच शकत नाही.
मानवजातीला त्या त्या वेळेला जे गरजेचे असेल ते ते कर्म करत राहणे हाच खरा धर्म”
सुजलेल्या डोळ्यांनी लेकीने विचारलं “खोटं बोलणं, प्रतारणा करणं हे कुठल्या धर्मात बसतं बाबा?”
“पंचविस वर्षांपूर्वी तुझ्या या नवऱ्याचं शुद्धीकरण करणारा तो दशग्रंथी ब्राह्मण मीच होतो.मला त्याचा सगळा इतिहास माहीत असूनही मी तुमचं लग्न लावलं,याने कुणाचीच प्रतारणा केलेली नाही, फसवणूक केलेली नाही.आज त्याने त्याच मार्गाचा पुन्हा स्वीकार करायलाही काही हरकत नाहीये माझी!”
निःशब्द झालेली दोन्ही मुलं आणि आई घरी आली.
मात्र,एकीकडे सुटला असं वाटणारा प्रश्न,त्याच्या पोटात कितीतरी गुंते घेऊन होता!
गुरुजींचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.
घरचे दारचे समजून घेतली ना?त्यांना कमीपणा तर नाही ना वाटणार? एक ना दोन अनेक शंका!!!

कुठेतरी एकटं जाऊन बसावं वाटत होतं, देवळाच्या बाहेरच्या एका बाकड्यावर ते बसून राहिले!!

एकीकडे असं वाटत होतं की आपण माणुसकीसाठी हा निर्णय घेतोय की स्वतःच्या स्वार्थासाठी?
जिथून स्वतःला सोडवून घेतलं तिथेच पुन्हा जातोय,नाईलाजाने.

दुसरीकडे वाटत होतं, महामारीच्या संकटात,संसर्गाची भीती न बाळगता केलेलं धर्मकृत्य, हे कितीतरी पुण्याईचं ठरणार होतं!
 शुभ आणि अशुभ याच्या पलीकडे नेणारे,पिंडी ते ब्रह्मांडी ईशतत्व एकच तर आहे!!
चिताभस्माची राख फसलेला शंकरच आणि लघुरुद्राच्या अभिषेकात भिजणाराही शंकरच आहे.
आणि त्या सर्व कल्पनांच्या पलीकडे नेणारा मनुष्यधर्म?? तो पाळायची संधी आज मिळते आहे!!

भवताली खूप ढगाळून आलं होतं..

गुरुजी घरी परत आले तेव्हा घरी सर्वजण वाट पाहात होते.
कुणीचकुणाशी बोलत नव्हतं.

शेवटी अक्षयने सुरुवात केली!!
“बाबा,आज माझ्या फी च्या निमित्ताने हा विषय निघाला,मी रोज पेपर वाचतोय आणि मृत्यूनंतरचे लोकांचे होणारे हाल वाचून त्रास होतोय.
जर आज डॉक्टर,नर्स,पोलीस यांच्याइतकी गरज कुणाची असेल,तर ती तुमच्यासारख्यांची आहे.
तुम्ही तिथे जाऊन धर्मकार्य केलंत तर,तुम्हीसुद्धा या लढाईत सहभागी असाल,आणि आम्ही तिघेही
तुमच्या सोबत आहोत. कमीपणा नाहीच उलट आम्हाला अभिमान वाटेल तुमचा"
आज धर्म,कर्म,मर्म सगळं एक झालं होतं.
पश्चातापाने विरघळलेल्या पत्नी सोबत आणि नव्या विचारांनी तेजाळलेल्या नव्या पिढीसोबत आयुष्याचा प्रवाह चालूच राहणार होता.
आज आभाळाच्या डोळ्यातून श्रावणाचा बांध फुटला होता.
बुरसटलेल्या कल्पना,अंधानुकरणाच्या चौकटी तोडून तो खळखळ वाहात होता.
तो,बंद देवळं भिजवत होता,
नदीघाटात झिरपत होता,हिरव्या शेतात कोसळत होता आणि जमिनीच्या भेगांच्या जखमा बुजवत होता.
देव्हाऱ्यातली पिंडी,निरांजनाच्या सुवर्णतेजात न्हायली होती,तिला हात जोडून,गुरुजींनी होकार सांगायला फोन उचलला.

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

Aug 7, 2020

सुफळ संपूर्ण

                               श्री सरस्वती प्रसन्न

                                 जिवती
     
ताजा  कडक लॉकडाउन.
दिवसक्रमांक एकशे-छत्तीस.
सुनसान रस्ते,गायब झालेली वर्दळ! 
एखाद्या भयपटाचा अदृष्य थरार!
कोरोनाचा श्रावण-स्पेशल कहर!!
हा कसला श्रावण?
देव्हाऱ्यात  चिकटवलेला कागद!!
देऊळ बंद!!
शिवामूठ नाही,लघुरुद्र नाही
मंगळागौरी नाहीत
जिवतीची सवाष्ण सुद्धा नाही
ऑफिसात शुक्रवारची चणे नाहीत

गेल्याच आठवड्यात ऑफिसचा वॉचमन पॉझिटिव्ह निघाला

पुन्हा एकदा सगळ्यांना घरी बसवलय.

आज अगदी मस्ट वालं काम आलंय
त्यामुळे मोजून पाचजणींना 
ऑफिसचे खास निमंत्रण आहे.
 काय अडलंय तुझ्याशिवाय या घरच्यांच्या प्रश्नापुढे मी निरुत्तर!
एरवी जिथे शंभर लोकांचा वावर तिथे फक्त पाच लढवय्या!
कुणीकुणाशी बोलत नाही,मास्कधारी अबोला!
इतक्यात ती अवतरते!
हातात इन्शुरन्स पेपर्सचा मोठा गठ्ठा!
मला गळ घालते(की गाळात घालते?)
“मॅडम, सगळ्या रीकवायरमेन्ट पूर्ण केल्यात.माझे पेपर कम्प्लिट करून द्याल का?”
मी काम संपवायच्या घाईत.
आत्ता ही कुठे तडमडली?तेसुद्धा मोठा किचकट केसेसचा गठ्ठा घेऊन!
काही नडलय का जीव धोक्यात घालून इथे यायचं? कोविडच्या टेन्शनमध्ये अधिकच भर.

मृत्यूभीतीमुळे आलेली इन्शुरन्स-लाट
हिच्या हातातल्या गठ्ठ्यात पोचलेली!
घाबरलेली तमाम जनता! 

इन्शुरन्सएजंटला फोनवरून निमंत्रण.
कसेही करून या आणि इन्शुरन्स पेपर पूर्ण करून घ्या!

हिचे सगळे पेपर म्हणजे,कामाचा जास्तीचा एक तास प्लस जोखीम आणि टेंशन सुद्धा
नको झालंय ते टेन्शन मला. 
मी वातावरण सैल करते.
“काय स्मिता तुझी अस्मिता का झालीये?जरा हास की.”

माझा जोक अगदीच फालतू,
न हसणेबल  असतो.

माझ्या प्रत्येक फालतू जोकला आवर्जून हसणारी स्मिता आज मात्र उदासलेली!
मी तिला पुन्हा उचकवते “ए रेड झोन कशाला आलीस ग आम्हाला त्रास द्यायला?.गपचूप घरी बस ना”

आता मात्र तिच्या डोळ्यात श्रावण धारा,
मास्क असला तरी त्यावरचे डबडबले डोळे दिसतात मला!
“काय ग? काय झालं?”
ती नुसती मान हलवते.
“मॅडम माझे पेपर्स ….एकदा चेक तरी करा……”
मला तिला जास्त त्रास द्यावासा वाटत नाही
शेवटी पेपर घ्यायला माझे हात पुढे होतात.
ती सतर्क!!!!!!
चटकन बाजूच्या सॅनिटायझरचा अभिषेक पेपरवर करते 
आणि माझ्या हातावरही. 
गरीबघरची असली तरी डोक्याने तल्लख.
पेपर वर्क, मशीन वर्क सगळं उत्तम जाणते.
बड्या इन्शुरन्स एजंटचा उजवा हात.
त्याची ऑफिसातली सगळी कामं झटझट उरकते.
चेष्टा मस्करी तर अखंड ,
 पण आज हे काहीतरी वेगळंच,
नक्की काय झालंय हिला?

कोरोना स्पेसिफिक डिप्रेशन?

हल्ली जिथेतिथे डिप्रेशन आहे.
जीवनरस शोषून घेतलेली उदासी.

तिचा चेहेरा ओढलेला ,डोळ्याखाली अशक्त काजळी,
हातापायाच्या काड्या,सगळ्या दिशांनी खपाटलेलं शरीर.
“बोल बाई पटकन,”असं मी  मनात म्हणते
 आणि तिच्याकडचे पेपर्स चेक करते.
सगळे ओके असतात.

मी पेपर पाहताना ती माझ्याकडे एकटक पाहात असते.

तिला काही बोलायचंय का?

मला आता सगळा ताण असह्य होतो.

सकाळी टिव्हीने कोकलून दिलेल्या मृत्यूच्या बातम्या,
मग आलेला ऑफिसचा फोन,
घरातुन मी निघताना झालेली कटकट,
कोविड सरंजामासकट निघताना आलेलं मणामणाचं ओझं,
रस्त्यात पोलिसांची उलट तपासणी.
बंद ऑफिसमध्ये शिरल्यावर डोळ्याला टोचणारे अस्वच्छ कुबट कोपरे
 आणि आता ही बया. 

डबडबलेल्या डोळ्यांची!!!!!!!!

पेपर्स कम्प्लिट करून झाल्यावर मी त्या पेपरवर ओकेवाले शिक्के मारते.
 आणि तिला पुन्हा टोचते,
”ए रेड झोन,तू खडकीला राहतेस ना?
 रेड झोन डिक्लेअर झालाय ना?मग तू कशी आलीस?
त्रास नुसता,केवढं काम मला देऊन ठेवलंयस”
ती इतकी स्मार्ट,की
पेपर पूर्ण झाल्यावर 
मी हे वाक्य बोलतेय
 याची खात्री झाल्यावर, 
भळभळ बोलत सुटते!
“मॅडम सारखं सारखं रेड झोन नका म्हणू!
 इथल्या साहेबांनी ऐकलं तर मला इथे येऊ देणार नाहीत.
आणि मी ऑफिसला आले नाही तर आमच्या साहेबांचं काम कसं पूर्ण होणार?मला ऑफिसात यायला आवडतं!
 घरात सासू खूप त्रास देतेय ,घरी बसणं नको झालंय."

“अगं पण आत्ता तुझं इथे येणं धोक्याचं नाही का?एकतर पब्लिक ट्रान्सपोर्टने येतेस.”

“मॅडम,माझ्या साहेबांनी तिन्ही महिन्यांचा सगळा पगार दिला,
 त्याशिवाय सोनूच्या दहावीच्या क्लासची अर्धी फी सुद्धा दिली.
मग मी त्यांचं काम नको का पूर्ण करायला?”…….

“अग मुलीच्या फी चं तुझा नवरा काहीच नाही का ग बघत?”

“मॅडम,फी चं काय बोलताय?गेले तीन महिने घरखर्च सुद्धा सगळा मी एकटी करतेय.
 लॉकडाउन मध्ये घरी बसलाय तो.
त्याला कामावरून कमी केलंय.
सध्या फक्त टीव्ही पाहतो आणि मोबाइल हातात घेऊन बसलेला असतो.
सासू त्याला काही बोलत नाही ,पण राग माझ्यावर काढते
त्यांच्या तिघांच्या गप्पा चालतात आणि सतत खायला मात्र मागत असतात.”

खोल गेलेल्या आवाजात तिची  घरघरकी कहानी!!!

हे तर घरोघरी होतंच की,
सुशिक्षित घरातही हातावर हात घेऊन बसलेले,
घरकामात मदत न करणारे पुरुष होतेच.
पण म्हणून हिच्यासारखं कुणी खपाटीला नव्हतं गेलं.

उलट लॉकडाउन आम्हा सगळ्यांच्या अंगोपांगी  बहरला  होता.

माझी चेष्टा ”मग?काय काय खायला घातलंस नवऱ्याला ?
आणि तू अशी फिकुटलेली का ग?
त्यांच्यासाठी करतेस ते तू नाही का स्वतः खात? 
प्रतिकार शक्ती चांगली लागते माहिती आहे ना??
चांगली खातपीत जा बाई.हळद दूध वगैरे पी.”

“मॅडम,सकाळपासून झाड-लोट,
सगळ्यांचे कपडे हाती धुवायचे,
 भांड्यांचा ढिगारा घासायचा.
त्यानंतर नाश्ता आणि स्वैपाक!!!!

सगळं झाल्यावर  मी खायला बसले 
की सासू समोर येऊन बसते
माझ्या जेवणाच्या ताटाकडे पाहात बसते.

मग मला नाही जात जेवण.

ती समोर आली की मी अर्धवट खाऊन, तशीच उठते!!"
“सासू,कामाला जरा तरी मदत करते की नाही ग? 
अग तू एवढी राबराब राबतेस घरासाठी कमावतेस मग करावी की तिने थोडीतरी मदत.”

 या प्रश्नावरचं तिचं हसू
  रडण्यापेक्षा जास्त वेदनादायी असतं.

“उठल्यापासून बाजेवर बसते 
आणि सारखी बडबड करत राहाते.
घर तिच्या नावावर आहे ना.
कामाचं काय घेऊन बसलात,
तोंड बंद ठेवलं तरी पुष्कळ झालं.
मॅडम सोनूची दहावी आहे. शाळा,क्लास सगळा अभ्यास ऑनलाईन चालतो,
मग तुम्ही सांगा घरात शांतता नको का?

मला खूण करून म्हणाली “एक गंमत दाखवू का?उठा माझ्यासोबत जरा या पलीकडच्या हॉलपर्यंत”

मी मुकाट्याने तिच्यामागे चालत जाते.

पाहाते तो ऑफिसच्या त्या पूर्ण रिकाम्या असलेल्या हॉल मध्ये
 सोनूचा  ऑनलाइन क्लास  चाललेला असतो.
तिच्या  चेहेऱ्याचा मास्क अर्धवट खाली आलेला असतो,

बाजूला बाटलीत हळद दूध असतं,
सासूच्या नकळत आणलेलं!!

सोनूची त्वचा तुकतुकीत असते.
मशागत केलेल्या पिकासारखा चेहेरा टपोरलेला असतो.

ही बया पोरीला शांततेत अभ्यास करता यावा म्हणून तिला इथे रोज घेऊन येते?
प्रवासाचा रिस्कसुद्धा घेते?

स्वतः अर्धवट खाऊन पोरीला भरपेट जेवण देत असणार,हे दिसतच होतं.

“मी आणि सोनू एकच स्मार्टफोन वापरतो
इथे तिला शांतता मिळते 
आणि माझा फोनसुद्धा वापरता येतो
मॅडम दोन दोन स्मार्टफोन परवडत नाहीत हो”

सोनुकडे पाहताना तिच्या  डोळ्याला  जिवती पान्हा  फुटतो.

मला अचानक श्रावण-साक्षात्कार होतो

रात्री जेवताना,
माझा पहिलाच घास अडतो. 
तिचा शुष्क चेहेरा,करपलेलं शरीर 
आणि ओढलेले डोळे मला टोचायला लागतात.
माझी टर्न नसतानाही मी शुक्रवार मागून घेते. 
श्रावणी शुक्रवार
जिवतीचा शुक्रवार

पहाटे लवकर उठून केर,लाद्या,भांडी,
आणि पुरणाचा स्वैपाकसुद्धा शिजतो!!!

आज मी उपास करायचं ठरवलंय .

आदल्या दिवशी आणून ठेवलेल्या सामानाची पिशवी आणि पुरणाच्या साग्र-संगीत जेवणाचा डबा मी अदबशीरपणे भरून घेते.

सासुचे फोनवर जिवती-गॉसिप चालू असतं.
”लॉकडाउन मध्ये ऑफिसला जायचं काही नडलाय तरी का?आम्ही आमच्यावेळी आम्ही रजा घेऊन शुक्रवारची सवाष्ण घालायचो.
हल्ली मी बोलणं सोडून दिलंय. करा काय हवं ते………"
असलं काहीबाही कानावर पडत असतानाच,यशस्वी दुर्लक्ष करत मी बाहेर पडते.
हातपाय उपाशी लटलटत असतात,
हातात दोन वजनदार बॅग्स असतात.
पण मी एकदातरी तिचा-वाला अनुभव  घेणार असते.
उपाशीपोटी काम,अजिबात जाणीव न ठेवणाऱ्या सासूची कटकट,त्यानंतर ऑफिस!
सामान स्कुटरवर अडकवून मी स्टार्ट मारते.
वाटेत अडवणाऱ्या पोलिसाला आदराने माझं आयकार्ड दाखवते.
ऑफिसात त्या रिकाम्या हॉल मध्ये मी डोकावते.
आजही सोनूचा ऑनलाइन क्लास चालू असतो.
आणि बाजूच्या टेबलवर डोकं टेकवून,
तिचा अर्धपोटी थकला देह,  निद्राग्लानीमय झालेला असतो.
मी पिशवीतून ताट,वाटी,भांडं काढते,
पुरणपोळीच्या जेवणाचा सगळा श्रावणी सरंजाम मांडते,
ताटाभोवती रांगोळी,उदबत्ती,सगळा थाट उडवते.
तिला हळूच हलवून उठवते.
तिचे विस्मयाने उघडलेले डोळे, प्रेमाने भिजतात.
मी तिच्या हातात गजरा देते,कुंकू लावते आणि तिला जेवायला लावते.
त्यादिवशीची जिवतीची ओटी मी  मास्क,सॅनिटायझर,खजुर,राजगिरा
लाडू,चिक्की,सफरचंद  या सगळ्यानी भरते. 
आणि साडीच्या जागी सोनूच्याक्लासच्या उरलेल्या फीचं पाकीट तिच्या हातात कोंबते.आणि वाकून तिच्या पायाला हात लावून नमस्कार करते.

ती संकोचाने कशीनुशी होते
पण शेवटी लखलखीत हसते .
कोरोनात हरवलेला माझा श्रावण मला  या जिवतीच्या रुपात सापडलेला असतो.
साठा उत्तराची तिची जिवती कहाणी लॉक डाउन नगरीत सुफळ संपूर्ण होणार असते......

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

Aug 1, 2020

सा खि

श्री सरस्वती प्रसन्न

               सा.खि.

वटपौर्णिमा नक्की कशी साजरी करावी याबद्दल आमच्या दोघांमध्ये कोविडद्वंद्व सुरू झालं होतं.

नवरा म्हणाला”बाहेर काय चाललंय आणि तू कसली वटपौर्णिमा साजरी करतेस? बास झालं आता.गपचूप घरात बस”

त्याला सहजासहजी सोडेन ती मी कसली!!!
पंधरा वर्षांपूर्वीचा दाखला देत म्हणाले “हो का? हे धाडस  तुमच्या मासाहेबांपुढे नाही दाखवलंत कधी? घरातल्या पूजेला मी कधी नाही म्हणाले होते का?
एकतर पावसाळा,त्यात ऑफिसची गडबड,त्यात जरिकाठी साडी,
दागदागिने,फुलं आणि पत्रीनं भरलेलं तबक अशी आमची वरात सोसायटी बाहेरच्या वडावर जायची.कधीकधी गुरुजींना उशीर व्हायचा. 
मला कंपलसरी कन्सेशन घ्यायला लागायचं, ऑफिस मध्ये उशिरा गेल्यावर आल्या सवित्रीमॅडम अशी चेष्टा मैत्रिणी करायच्या ते वेगळंच.
आणि तुमच्या मासाहेबांच्या साम्राज्यात हे थोडथोडक नाही,तर कित्येक वर्षे चालूच राहिलं”

फोटोतल्या मासाहेब,माझी वटवट सावित्री ऐकून डोळे वट्टारुन माझ्याकडे पाहातायत हे मला समजत होतं,तरीही न डगमगता मी बोलतच राहिले.
 माझ्या स्वराचा प्रवास कातर कडून खोचक असा सुरू झाल्यावर मात्र नवऱ्याने विषयाची गाडी,कोरोनाकेअरकडे वळवली.

”अगं,ते जुनं कशाला उगाळत बसतेस? मी तुझ्याचसाठी म्हणतोय की त्या वडाच्या पारावर कुठून कुठून बायका येतील आणि सोशल डिस्टनसिंग पाळता येणार नाही.
बरं येणाऱ्या सगळ्याजणी मास्क लावून येणार आहेत का? 
त्यापेक्षा तू घरीच पूजा कर ना. आणि उपास कर म्हणजे झालं.
आम्हीसुद्धा करू कीं वटपौर्णिमेचा उपास!!!”

मला त्याच्या संवादाची दिशा हळूहळू साबुदाणा खिचडीकडे वळते आहे हे लक्षात आलंच होतं. 
यांच्या तमाम पूर्वजांपासून एकमताने पास होणारा लाडका पदार्थ म्हणजे सा खि अर्थात साबुदाणा खिचडी.
पातेलं भरून साबुदाणा भिजवावा,
त्यावर दाण्याच्या कुटाचा ढीग रचावा, दोन तीन गुटगुटीत बटाटे त्यात ढकलावे,आणि अशा रीतीने कढई काठोकाठ भरून खिचडी करावी!!!!

 आणी पहिलं वाढप करून एखादं दुसरं काम करून कढईपाशी  यावे तर क्षणार्धात तो गोरागोरा कॅलरीयुक्त ढीग भुईसपाट!
ही खाद्यकिमया हेच लोकं करू जाणे!!!
उत्तर माहिती असूनही मी साळसूदपणे विचारलं”उपास तर आहे काय करू हो उपासाला उद्या?"

माझ्या स्वरात लपलेला खोचकपणा नवऱ्याच्या अजिबात लक्षात नाही आला.
 तो खुश होत,बेसावधपणे म्हणाला”असं कर,साबुदाणा खिचडी नाश्त्याला कर. आणि तो उपास रात्री सोडायचाच नसतो ना,मग मी काय म्हणतो रात्री साबुदाणावडे होऊन जाऊदेत”

मी थक्क!!!!!!!!!!!

एरवी गुरुजींनी साधं गोत्र विचारलं तरी माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघणारा हा माणूस वटपौर्णिमेचा उपास रात्री सोडत नाहीत ही माहिती सोयीस्कर बाळगून होता. 

याला काय जातंय फर्माईशी सोडायला? इथे अडीच महिने घरातली सगळी कामं करून कंबरडे मोडायची पाळी आली होती. मदतीच्या नावाने बोंब होती. भांडी घासायचे घेतलेले एकुलते एक काम इतक्या गलिच्छपणे करायचा की “नको ती मदत” असं म्हणायची पाळी आली होती.
फक्त साबुदाणाखिचडीचा मला वैयक्तिक फायदा असा होता की,पोहे उपम्याला नाक मुरडणारी मुलं, सा खि वर तुटून पडत होती. 
त्यामुळे घरातल्या सर्वांचे खिचडीवर  कायमचे एकमत होत असे.

रात्री साबुदाणा भिजत घालायला डबा उघडला,आणि पहाते तो काय साबुदाणा संपलेला.

(फोटोतुन मासाहेबांनी डोळे वट्टारले,वटपौर्णिमेच्या आदल्या रात्री घरातला साबुदाणा संपलेला?????? या अपराधाला क्षमा नव्हती)

खिचडी जमायचे एक तंत्र असते. रात्री साबुदाणा भिजणे मस्ट असते.

त्यामुळे मी ज्याम वैतागले होते...
नवऱ्याला रात्रीच बजावून ठेवलं की "उद्या नाश्त्याला खिचडी शक्य नाही.आणि रात्री साबुदाणावडे हवे असतील तर सकाळी वाण्याकडे
 जाऊन साबुदाणा घेऊन ये."

नाश्त्याला सा खि नाही हे समजल्यावर त्याचा चेहेरा पडलाच!!
पण वाण्याकडे जायच्या प्रपोजलला क्षणात कबुल झाला.
 हा माणुस साबुदाणावडे किंवा खिचडीसाठी काय वाट्टेल ते करेल. गजर लावून,पहाटे उठून,वाण्याकडे लाईन लाव म्हटले तरी तयार होईल.

दुसऱ्यादिवशी सकाळी आठ वाजता, नाश्ता सुद्धा न करता गेला,कारण लॉकडाउन मुळे वाण्याकडे लाईन लावायला लागत होती. 
मी मात्र केर लाद्या करून मग अंघोळ आणि त्यानंतर जेवणाची तयारी आणि एकीकडे पूजेची तयारी अशी कामं, क्रमाक्रमाने करायचं ठरवत होते.
या सगळ्यात दोन तास सहज गेले.

 दहा वाजता मुलांपुढे मॅग्गीची डिश ठेवली तेव्हा त्यांनी तिर्थरूपांच्या पावलावर पाऊल ठेऊन सुरवात केली
"हे काय आई,खिचडी करणार होतीस ना?"
"अरे,घरातला साबुदाणा संपलाय,तोच आणायला बाबा वाण्याकडे गेलाय. एरवी मॅगीवर तुटून पडता ना?मग आज तोंड वाकडं करायला काय झालं रे?"
धाकटा दीर्घ श्वसन करत म्हणाला "आई शेजारून खिचडीचा वास येतोय सकाळपासून .काल तूच  म्हणालेलीस ना खिचडी करणार म्हणून?"
(फोटोतून माँसाहेब कौतुकाने म्हणत होत्या "आमच्याकडे पुरुषांची नाक अगदी तीक्ष्ण आहेत हो")
"अरे ,साबुदाणा घरात तरी येऊंदे ना. हे बघ,मी संध्याकाळी साबूदाणावडे करणार आहे.आता मॅगी खा आणि अभ्यासाला जाऊन बस बघू"

मुलांना नाश्ता दिला,माझी उपासाची थालिपीठं लावायला घेतली,तरीही या माणसाचा पत्ता नव्हता.
बर वाण्याचे दुकान घराजवळच म्हणून गाडी नेली नव्ह्ती आणि मोबाईल सुद्धा नेला नव्ह्ता.त्यामुळे नक्की कुठे अडकला आहे हे सुद्धा विचारता येत नव्हते.
नक्की याला कुणीतरी मित्र भेटला असावा आणि बसला असेल गप्पा ठोकत,या विचाराने वैतागलेली मी अडीच तास झाल्यावर मात्र चिंतातुर झाले.

मुलांचे ऑनलाइन क्लास चालू असल्याने बाबाला शोधून या म्हणता येत नव्हते.

घराची स्वछता, मुलांचा नाष्टा,पूजा आणि कुकर लावणे एवढी काम झाली होती.
अकरावाजता मात्र मास्क लावून निघाले त्याला शोधायला.
दहा मिनिटात येणारा माणूस अडीच तास गायब होतो म्हणजे काय?

वाण्याकडे उभ्या असलेल्या लाईनीतल्या लोकांच्या चेहेऱ्याकडे वेड्यासारखी पाहत राहिले.

मास्क लावलेल्यांमधून आपलं माणूस शोधणं कठीण होतं.
लाईन खूप मोठी होतीं पण त्यामध्ये हा नव्हताच. 
पोलिसांनी मॉर्निंगवॉकवाला समजून उचलून नेलं की काय?

सध्या रस्त्यावर सिग्नल नसल्यामुळे भरधाव वाहने येत जात होती आणि अगदी परवाच या रस्त्यावर अकॅसिडेंट झाला होता. 
 तो विचार मनात आला मात्र आणि हातपाय गार पडायला लागले. 
वटपौर्णिमेच्या दिवशी यायला नको ते सगळे विचार मनात येऊन गेले.
कुठून त्याला साबुदाणा आणायला पाठवला असं मला झालं होतं.

 या माणसाला आता मी कुठे शोधू?
 याला काय झालं असेल?
 मला एकदम आठवलं हा बीपीची सकाळची गोळी न घेताच खाली उतरला होता.

 देवा!! म्हणजे वाटेत कुठे चक्कर वगैरे येऊन नसेल ना पडला?

त्यात हे सध्याचे कोरोनाचे दिवस!!!

 माझ्या हाताला घाम सुटला.काय करू आणि कुणाला विचारू काहीच समजेना.
मी खाली उतरून पंधरा मिनिटं झाली होती.
अकरा साडेअकराच्या रणरणत्या उन्हात मी हातात मोबाइल घेऊन,
नेमका कुणाला फोन करावा या विचारात सुन्न उभी होते.

रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.

मनात येणाऱ्या भलभलत्या विचारांना कसंबसं थोपवत मी,कापऱ्या पावलांनी घराच्या दिशेने निघाले.
अगदी गेटपाशी तो वडाचा पार  दिसला.
श्रावण चाहूल लागलेला,गच्च हिरवा वड,पाऊस पिऊन गडद झालेला.

आजच्या लॉकडाउनमध्ये सुद्धा कितीतरी बायका येऊन गेलेल्या दिसत होत्या. 
गुंडाळलेल्या सुताचे,हळदी कुंकवाने माखलेले वेढे,वाहिलेल्या फुलांचे सुगंधी ढीग, जळून गेलेल्या उदबत्त्यांचे धुपाळलेले निःश्वास अजूनही तिथेच रेंगाळत होते. 
माझी पावलं नकळत तिथे वळली.

मी हात जोडले. 

मागच्या तासाभरात मी कितीतरी वाईट आणि अभद्र  कल्पना करून मनाला खूप त्रास करून घेतला होता.

नकळत माझ्या डोळ्यात पाणी जमलं.
 
“हे निसर्गदेवा,माझं,माझ्या कुटुंबाचं आणि या अवघ्या विश्वाचं रक्षण कर”

 अशी प्रार्थना करून मी हात जोडले,
आणि नतमस्तक झाले खरी,
पण अडीच-तीन तास घरी न आलेल्या नवऱ्याच्या सुखरूपतेबद्दल मी मनोमन साशंक होते.

मुलं माझीच वाट पाहात टेरेसमध्ये येरझारा घालत होती.
का कुणास ठाऊक पण मुलांना बघताच मला एकदम रडायलाच यायला लागलं. 
ती बिचारी कावरीबावरी झाली होती. ”आई,बाबा नाही सापडले का गं?त्यांना आता कुठे शोधायचं?"

शेजारच्या काकांना आणि  वहिनींना बोलवायचा विचार मनात आला.

खड्डयात गेलं ते सोशल डिस्टनसिंग असं म्हणत त्यांच्याकडे जाण्यासाठी दरवाजा उघडला आणि पाहाते तो..........
 दारात, घामेजल्या, लालेलाल चेहेऱ्याने सत्यवानराव हजर!!!!
त्याला बघताच मला जास्तच रडू फुटलं.

असंख्य प्रश्न मनात असूनही  तोंडातुन शब्द फुटेना.तो घरात आल्यावर त्याच्या हातातली पिशवी घेऊन मी लगोलग सरबताचा ग्लास त्याच्या हातात ठेवला.आणि मटकन खालीच बसले.
नवऱ्याला घरात झालेल्या घबराटीची कल्पनाच नव्हती.त्याने सरबताचे घोट घेत घेत,विजयी योध्याच्या थाटात कथाकथन सुरू केले.
”अगं घरातून निघालो आणि वाण्याकडे पोचलो. तिथे माझा आठवा वगैरे नंबर लागला.अरे लोक किती *चवीचवीने* किराणा खरेदी करतात राव. माझा नंबर यायला पाऊण तास लागला.आणि अगं आपल्या वाण्याकडचा साबुदाणा संपला.
साला,साबुदाणा कसा काय संपतो?
याला स्टॉक ठेवता येत नाही?” 

याचं माझ्या रडवेल्या चेहेऱ्याकडे लक्षही नव्हतं.

साबुदाणा कथा पुढे चालूच.........

“मग मी विचार केला लॉकडाउन चालू आहे, वस्तू संपू शकतात,मागच्या आठवड्यात ट्रान्सपोर्ट सुद्धा बंद होता .आणि आमच्यासारखे खवय्ये आजूबाजूला असताना साबुदाणाच काय पण साखर आणि मीठ सुद्धा संपेल” स्वतःच हसत हसत म्हणाला.
( कप्पाळाला हात!!!!! )
”शेवटी मी काय केलं असेल? एक मित्र भेटला,त्याच्या कारमधून सरळ पुढे गेलो आणि तिथल्या किराणा दुकानाशी पुन्हा लायनीत उभा राहिलो.तिथे दोन तासाची लाईन लावावी लागली.”
एव्हाना माझा संयम संपला होता मी संतापून म्हटलं “अरे महान माणसा तुला घरी कळवावेसे नाही वाटलं? अरे माझ्या काळजाच पाणी पाणी झालं होतं तुझी वाट पाहून.
मनात किती विचित्र विचार येऊन गेले”
माझ्या चेहेऱ्यावरची रडवेली झाक आत्ता कुठे साहेबांच्या लक्षात आली.
“तू कमाल करतेस,रडतेस कसली?
मी फोनसुद्धा नेला नव्हता मग कळवणार कसं? आणि बाहेरून फोन करायचं मला नाही सुचलं.
तर शेवटी त्या दुसऱ्या दुकानात दोन तासांनी माझा नंबर लागला आणि साबुदाणा मिळाला.चांगला चार किलो घेऊन आलोय.आता लॉकडाउनमुळे वस्तू स्टॉक केलेल्या 
बऱ्या नाही का?”

मी अवाक होऊन त्याचे कथन ऐकत होते,एकीकडे दया सुद्धा आली होती आणि त्याच्या पेशन्सचे कौतुकही वाटत होते.

सकाळी काहीही न खातापिता,आठ वाजता बाहेर पडलेला माणूस,तीन तासांची लाईन लावूनही न चिडता शांत राहिला होता.
आणि एखाद्या विजयी योद्धयाच्या थाटात साबुदाणा घेऊन आला होता.

किती???? चा  र  कि  लो!!!!!!!

त्याचा नाश्ता हुकला होता आणि आता हा  काहीतरी अरबट चरबट खायला लागेल,त्यापेक्षा जेवायलाच द्यावे असा विचार करत मी पोळ्या लाटायला घेतल्या,आणि त्याला पहिला जेवायला बसवला.

या सगळ्या *साबुदाणानाट्यात* माझ्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता.थालीपीठ केलेली असूनही खायचं भान राहिलं नव्हतं.मगाशी भीतीने कापणारे हातपाय आता भुकेने कापत होते.
(फोटोत माँसाहेब म्हणत होत्याच, आम्ही वटपौर्णिमेचा कडकडीत उपास करायचो)
 हे आम्ही प्रकरण मला शेवटपर्यंत समजलंच नव्हतं.लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर सूनबाईंचा प्रवेश त्या आम्हीच्या वर्तुळात झालाच नव्हता.

मी सोडून सगळ्यांची जेवणं उरकली.

मुलं आपापल्या खोलीत गेली आहेत असे पाहून नवऱ्याने मागून येऊन कंबरेभोवती विळखा घातला.

मी क्षणभर सुखावले .नवऱ्याने लाडात येऊन बोलायला सुरुवात केली”जन्मोजन्मी मला तूच हवीस बरं का.” 
मी चक्क लाजले वगैरे!!!
आणि त्याला विचारलं “का हवी आहे मीच सातजन्मी?” 
विचारताना माझा स्वर कातर की काय म्हणतात तसा झाला असावा.

थालीपीठ,भूक,उपास साऱ्या साऱ्याचा जणु विसरच पडला होता मला.
आणि प्रियकराच्या रोलमध्ये शिरलेला माझा नवरा कुठलं रोमँटिक उत्तर  देतो,याकडे माझे कान लागले होते.

“तुझ्यासारखी साबुदाणा खिचडी या भूतलावर कुणालाच जमत नाही ना.
अग,त्या संज्याची बायको बकवास बनवते खिचडी, एकदम गोळा ,
आणि मावशीसुद्धा एरवी पुरणपोळ्यापासून सगळं भारी बनवत असली ना तरी तिची खिचडी एकदम चामट होते."........
एकतर पुरूषांनी अशा टिपिकल बायकी कमेन्ट केलेल्या मला अजिबात आवडत नाहीत (कितीही अचूक शब्द वापरले तरीही)
आणि कम्बरेला विळखा वगैरे रोमँटिक स्टार्ट घेतल्यावर कानशिलं की काय म्हणतात ती तापल्यावरचे हे उत्तर ऐकल्यावर माझा वाढीव-वयातला रोमँटिक फिवर झरकन खाली उतरला.

आणि चिडून त्याला बाजूला ढकलून मी थालिपीठं,डिशमध्ये घेतली.

मी पाहिला घास घेणार इतक्यात  म्हणाला 
“ आता याच्यात चिडायला काय झालं बुवा? तुझंच कौतुक करत होतो ना मी? कधी चिडशील काही नेम नाही तुझा. बरं आता मी जरा पडतो.” असं म्हणून सत्यावानराव चक्क शयनगृहाकडे रवाना.....

आणि पुढे गेलेला उलट्या पावली परत आला आणि म्हणाला”ते साबुदाणे भिजवायला विसरू नकोस,जरा जास्तीच भिजव,म्हणजे रात्रीला साबुदाणेवडे पोटभर खाता येतील.
आणि आजची राहिलेली सा खि,
एकदोन दिवसांनी नाश्त्याला होऊन जाऊदे.”
(फोटोतून माँसाहेब लेकाची दृष्ट काढतायत असा भास मला झाला)

त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत, मी थक्क झालेल्या मनानी,उपाशी पोटानी आणि माझ्या त्या खरकट्या न झालेल्या हातानी माझ्या सत्यवानाला कोपरा पासून हात जोडले.


योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे