Sep 30, 2020

मुंबईची सहनसिद्धी

श्री सरस्वती प्रसन्न

           *मुंबईची सहनसिद्धी*
   
मुंबईवर बॉम्बफेक होणार अशी आवई उठलेली.
आवई कशी म्हणायची?खरोखरच तसा प्रसंग उदभवला होता.
आकाशात लढाऊ विमानांची घरघर सुरू झाली होती
1972 च्या पाकिस्तानवॉर वेळीचा प्रसंग. माझं वय अंदाजे सात.

आमच्या सहनिवासातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने गस्त घालायचं ठरवलं होतं.खिडक्यांना काळे कागद चिकटवायच्या सूचना आलेल्या.  रात्री दिवे घालवायचे असा इशारा मिळूनही काही घरात दिवा लागायचा आणि मग गस्त घालणारी मंडळी *“जोशी बाथरुम मधला दिवा घालवा”* अशी आरोळी ठोकायचे.
जोशी आणि *गस्तवान मंडळी* दोन्हीबाजूनी समसमान समजूतदारपणा! 
त्यामुळे राग,चिडचिड,आमचे नाव का मोठ्याने घेतले वगैरे इश्यू कधीच नाही झाला.
नोकऱ्या चाकऱ्या सांभाळून गस्तपथके रात्रीरात्री राबत असत आणि एकमेकांना युध्दकाळातही आधार देत असत.
*माझी मुंबईच्या सहनसिद्धीबद्दलची ही सर्वात जुनी आठवण!!!!*
मुंबईकरांच्या रक्तातच ह्या सिद्धीचं *हिमोग्लोबीन* ठासून भरलंय.
मुंबईची जीवनरेखा असलेली रेल्वे, हिचे या सहनसिद्धीमधले योगदान अपूर्व म्हणावे लागेल.
खचाखच भरलेली एखादी वसई किंवा विरार लोकल असते,ती अंधेरी पर्यंत येतानाच ओतप्रोत भरलेली असते..
बाहेरून तिच्याकडे पाहता आतमध्ये इंचभरही,जागा नसते.तरी अंधेरी स्टेशन आले की आतले आणि बाहेरचे असा भेदभाव उरत नाही,आणि बाहेरच्यांना अलगद आत सामावून घेतलं जातं,तिघांच्या सीटवर चौघांना सामावून घेतलं जातं तसंच!!
पुढच्या स्टेशनात तीच (जणू)अध्यात्मिक देवाणघेवाण होते आणि ती चालूच राहाते.
नुसती चालू नाही राहात तर त्या तसल्या गर्दीत भजनं चालतात,आणि डोहाळजेवण, हळदीकुंकू आणि भोंडले सुद्धा रंगतात.

नुसते रेल्वेच्या डब्यापुरते नाही तर,बाहेरच्या प्रांतातून आतमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई अलगद सामावून घेते. आणि त्याची राहायची खायची प्यायची सोय कुठेतरी नक्की होते.
आतल्या आणि बाहेरून आलेल्या सर्वच मंडळीना अहोरात्र तडजोड मात्र करावी लागते.
सगळ्या पातळीवरची तडजोड,
खुराड्या सारख्या जागेत राहायची,तुडुंब गर्दीने भरलेल्या वाहनाने प्रवास करायची,महागाईला तोंड द्यायची,राजकीय हतबलतेची…….सगळीच तडजोड!!
*मुंबई शहराच्या कणाकणात ही तडजोडीची विलक्षण सिद्धी रुजलेली आहे.*
नेमेची आलेल्या पावसाळ्यात मुंबईची *तुंबई* होते.
माझ्या लहानपणी असाच एक उधाणलेल्या पावसाचा दिवस होता.रेल्वे ट्रॅक हळूहळू भरायला लागलेले.
किंग्ज सर्कल,हिंदमाता, सांताक्रूझ-सबवे अशा लाडक्या लेकरांवर वरुणराजाने *स्पेशल-पॅकेज* जाहीर केलेलं.
झालं……...दुपारीच गाड्या बंद पडल्या. संध्याकाळी सहापर्यंत घरी पोचणारे आईबाबा,रात्रीचे दहा वाजल्यानंतरही घरी आलेले नव्हते.
चाळीतल्या मुंबईकर शेजाऱ्यांनी आम्हा लहान मुलांना जेवायला घातलं.सोबतीला येऊन बसले.
आई बाबा *चर्चगेट ते अंधेरी* असे अंतर रात्री रेल्वेट्रॅकमधून चालुन,पहाटे घरी पोचले. बरं त्याची कुठे तक्रार नाही की कुरकुर नाही.
*परिस्थितीचा अटळ स्वीकार*.
ही कथा केवळ माझ्या आईवडिलांची नाही तर तमाम मुंबईकरांची होती *आणि अजूनही आहे.*

ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची.

पण तसाच प्रसंग 26 जुलैच्या पूराच्यावेळीही घडत होता.
लोकं मिळेल त्या वाहनाने घरं गाठायच्या प्रयत्नात होते आणि वाहन न मिळालेली तमाम जनता,रस्त्याने पायी चालली होती.
तेव्हा आसपासच्या घरातून,हातात पार्ले ग्लुको बिस्किटाचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन मुंबईकर खाली उतरला होता, आणि घर गाठणार्या *मुंबादेवीच्या वारकऱ्यांना* आधार देत होता.
गैरसोय पचवून पायी निघालेल्या मुंबईकरांच्या सहनसिद्धीची आणि रात्री अपरात्री,वादळी पावसात,घरात बसून न राहाता त्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या मुंबईकरांच्या सहनसिद्धीची देखील कमाल वाटते.
*सहनसिद्धी* शब्द ज्ञानेश्वरमाऊलींनी त्यांच्या लेखनात वापरलेला आहे
त्यामुळे त्या शब्दालाच एका व्रतस्थ योग्याची तेजझळाळी आहे
आणि अनेक आपदांमध्ये तावून सुलाखून निघालेल्या मुंबई आणि मुंबईकरावर या *तेजझळाळीची प्रभावळ आहे*.
मानसशास्त्राप्रमाणे सहनसिद्धी शब्दाचा अर्थ होतो इंग्रजीतला फ्रस्ट्रेशन टॉलरन्स
म्हणजेच,मनस्वास्थ्य ढळू न देता,शांत राहून विपरीत परिस्थितीला तोंड द्यायची क्षमता अथवा कुवत!!

मुंबईकरांनी मिठी नदीवरआक्रमण केले आणि त्याची मोठी किंमत मृत्यूंतांडवाच्या रूपाने चुकवली!
तसंच समुद्रावरील *रेक्लेमेशनच्या* रूपाने निसर्गावर अंकुश मिळवायचाही प्रयत्न केला खरा!

पण येणाऱ्या अफाट लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी निसर्गाविरुद्ध केलेला हा प्रयत्नसुद्धा मुंबईकरांना प्रत्येक पावसाळ्यात भारी पडतो.

26 जुलैला मिठी नदीने मुंबईच्या थोबाडीत मारली,तरीही गाल चोळत मुंबईकर अलिप्तपणे चालतच राहिला.
लाखोंच्या मनाला चटका लावून *डॉक्टर अमरापुरकरांसारखा* एक प्रथितयश डॉक्टर उघड्या गटारातून मृत्युमुखी पडतो तेव्हा मुंबईकर विलक्षण हळहळतो.
असे अनेक डेथ टोल दरवर्षी देत देत मुंबई सहनसिद्धीचे व्रत घेऊन ताठपणे उभी आहे.
लोकसंख्येच्या फुगवट्यामुळे पाणी व वीज पुरवठा यासारख्या व्यवस्थांवर ताण आले, निसर्ग रुसला,प्रदूषण वाढले,रेल्वेवरचा अतिरिक्त ताण वाढला,गर्दीच्या भडक्याने लोकांचं मनस्वास्थ्य पणाला लागले,जागांच्या किमती गगनभेदी झाल्या.
या पार्श्वभूमीवर,राजकारण्यांच्या *क्षीण इच्छा शक्तीमुळे* रस्ते मात्र खराबच राहिले,गटार साफ झालीच नाहीत आणि झोपडपट्ट्याना दिलेल्या *राजकीय आशीर्वादामुळे* बकालपणा मात्र बेसुमार वाढतच गेला.
या सगळ्याचा अतोनात त्रास झाल्यावर कधीकधी मुंबई रस्त्यावर उतरते,रेल्वे ट्रॅकवर येऊन आंदोलन सुद्धा करते.
पण ते अगदीच क्षणिक असतं.
सत्य हेच असतं की सगळ्या त्रासांसकट आणि दोषांसकट *मुंबईच्या कुशीत,मुंबईकर खुशीत असतो.*
तो क्षणिक रागावतो, आणि नंतर रागावणे विसरून पुढे चालू लागतो.
मुंबईवर अनेक *जखमा* आहेत.तिने त्या लपवलेल्या असतील पण त्या आहेत हे निश्चित.
बाबरी मशिदीच्या वेळेला झालेल्या धार्मिक दंगली!!!!!!!
सर्वांना सामावून घेणाऱ्या मुंबई शहराला,कधी नव्हे ती धार्मिक तेढ पहायची वेळ आली होती.
पण त्याने निर्माण झालेली क्षणिक तेढ ,काही महिन्यांनी मावळली.

1993 साली झालेली बॉम्ब स्फोटाची मालिका,ओळीने झालेले बॉम्ब स्फोट,
त्यातले काही तर रेल्वेमध्ये झाले होते तरीही ती *मुंबईची जीवनवहिनी* बंद नाही पडली.
२७ नोव्हेंबरचा ताज हल्ला हा तर मुंबईच्या मानबिंदूवर पडलेला घाला होता.
कामा हॉस्पिटल, ताज हॉटेल,ओबेरॉय ट्रायदंत हॉटेल,नरिमन हाऊस, लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक या सगळ्यावर अतिरेकी हल्ला झाला.मुंबई भीतीने गोठून गेली होती.
तुकाराम ओंबाळे नावाच्या एका मुंबईकर कॉन्स्टेबलने अतुलनीय धैर्य दाखवून अजमल कसाबला पकडलं.
*आणि मुंबईकरांच्या सहनसिद्धीच्या मुगुटात,अतुलनीय धैर्याचेही पीस रोवले गेले.*
मुंबईचा माणूस घाबरून गेला होता पण तो थाम्बला नाही पुन्हा नव्याने जनजीवन सुरू झाले.
परळला कोसळलेला ब्रिज असो वा बॉम्बस्फोटाच्या रक्तरंजित मालिका असोत.
त्याने घाबरून तो घरी बसून राहत नाही आणि रेल्वेने जाणेही बंद करत नाही.
नाही म्हणायला गेल्या काही वर्षांत मुंबई-मेट्रो आली आणि तिने रेल्वेच्या ताणाला थोडं हलकं केलं.
प्रवाशांचे जीवन थोडं सुसह्य झालं.
पण इथेही कसोटीच्या प्रसंगातून सुटका नसते.एखादेवेळी हवेतून चालणारी मेट्रो तांत्रिक बिघाडामुळे हवेतच बंद पडते......
कधीकधी चार पाच तास सुद्धा!!!!!आतमधली वातानुकूलित यंत्रणा बंद पडते.आत अडकलेला घामाघूम झालेला, मुंबईकर तेही सहन करतो.
*मुंबईकर कुठल्याही संकटाचे *भयंकरीकरण करत नाही.त्याची *सहज स्वीकाराची अफाट क्षमता* त्याला या सगळ्या संकटात न डगमगता खंबीरपणे उभी ठेवते.

एकाक्षणी असंही वाटतं की हातातोंडाची गाठमिळवण्यासाठी,
पोटाची खळगी भरण्यासाठी ही *वज्र-तडजोड* त्याच्यावर लादली तर नाही ना जात? नाईलाजापोटी तो हे सहन करतो का?

पण पुढच्याच क्षणी वाटतं नाही मुंबईकर असहाययतेपोटी तडजोड नाही करत.
त्याची सहनसिद्धीच इतकी विलक्षण आहे की त्या सामर्थ्याच्या जोरावर तो पुढेच जात राहतो.
मुंबईकरांच्या रक्तात अजून काही घटक आहेत जे त्याची ही सिद्धी वाढायला कारण ठरतात.

मुंबईकर सर्व सणांवर,नाट्य सिनेसृष्टीवर,क्रिकेटवर,
तुडुंब प्रेम करतो.
तो गणपतीत नाचतो,गरबा खेळतो,दहीहंड्या फोडतो,गल्लीत क्रिकेट खेळतो,आणि अपघातात मृत्यूपंथाला लागलेल्या अमिताभसाठी सिद्धिविनायकला नवसही बोलतो
*अगदी धारावीवाला मुंबईकर, अँटिलियाचे स्वप्नसुद्धा पाहतो* आणि सत्यात मात्र अगदी जमिनीवरची लढाई लढत जगतो.
आणि त्याच्या त्या सहजतेचं विलक्षण आकर्षण अवघ्या जगताला वाटत असावं!
म्हणूनतर एखादा *स्लम डॉग मिलियनर* ऑस्कर सुद्धा गाठतो.

मुंबईच्या कलेबद्दल ज्ञानाबद्दल वैद्यकीय सुविधांबद्दल काय बोलावे!!

एन सी पी ए,काळा घोडा फेस्टिव्हल, रवींद्र नाट्य मंदिर,शिवाजी मंदिर,
षण्मुखानंद हॉल,जहांगीर आर्ट गॅलरी यासारखि कलामंदिरं…
टी आय एफ आर किंवा बी ए आर सी, आय आय टी, यु डी सी टी(आय सी टी)यासारखी ज्ञान मंदिरं...

टाटा कॅन्सर हॉस्पिटल,जसलोक,
नानावटी,लीलावती,बॉम्बे हॉस्पिटल सारखी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवणारी आरोग्यमंदिरं......
या साऱ्यासाऱ्याचा मुंबईच्या स्वभावावर आणि तिच्या शक्तीवर,
सिद्धीवर उर्जादायी परिणाम नक्कीच होत असणार.

मुंबईकराचा विकपॉईंट म्हणजे
 *सिने सृष्टी आणि क्रिकेट!!!*
त्यातल्या ताऱ्यांच्या तो भजनी लागतो त्यांच्यावर ओतप्रोत प्रेम करतो.
त्यांच्यासोबतची स्वप्ने सुद्धा रंगवतो.

पण ह्या सर्व झगमगीत दुनियेबाबत मुंबईंकर *सॉरटेड* मात्र आहे.
स्टेजवर जे आहे ते किंवा छोट्या मोठ्या पडद्यावर जे आहे ते वास्तव नाही याची( *आध्यात्मिक?* ) खूणगाठ त्याने बांधलेली असते.

 ते आयुष्य,ती स्वप्न आपली नव्हेत याची पक्की जाणीव तो ठेवून असतो.
त्यामुळे त्याने स्वप्न पहिली तरी स्वप्नभंगाची फ्रस्ट्रेशन त्याला येत नाहीत.आणि यदाकदाचित आलीच तर ती तो सहजतेने पचवतो.

ही *सहनसिद्धी* त्याला कुठून येत असेल?
बहुतेक,सिद्धिविनायक,माऊंटमेरी,हाजीअली,महालक्ष्मी,लालबागचा राजा हे सगळे *सर्वधर्मसमभावाने*,
ती सिद्धी प्राप्त करून देतात मुंबईकराला!!!!
तसही मुंबईकराला वेगळा असा जाती धर्म आहेच कुठे?
त्याची जात एकच, *माणूस ही* ! धर्म एकच, *मनुष्यधर्म हा!!!*
म्हणूनच हरताळकेचा कडक उपास करणारी एखादी मनीषा ,तिच्या ऑफीसातल्या,साजीदाने आणलेला,शिरकुर्मा चवीने खाते आणि जेनीने दिलेल्या ख्रिसमस केकवरही तुटून पडते.
आणि गणपतीत त्याच साजीदा आणि जेनी फुलबाजारातून फुलं घेऊन मनीषाच्या घरी गणेश दर्शनाला येतात आणि प्रसादाचे मोदक खातात.

तर अशीही मुंबई आणि मुंबईकर!!!
दशकानुदशके तिच्यावर होणाऱ्या, परप्रांतीय लोंढ्याच्या,
प्रदूषणाच्या,वादळी पावसाच्या,
अतिरेकी हल्ल्याच्या,बॉम्ब स्फोटाच्या
आक्रमणांना *सहनसिद्धीच्या* अलौकिक बळावर तोंड देत ठाम आहे.
एकवेळ सहनशक्ती संपू शकते पण सहनसिद्धी ही चिरकाल टिकणारी असते.
*तशीच मुंबई आणि मुंबईकर त्याच्या या अलौकिक सिद्धीच्या बळावर सर्व विपरिताच्या विरुद्ध, चिरकाल उभेच राहणार आहेत!!!!!!!*
योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

Sep 20, 2020

मन्थएंड

    "ए आजच्या बांगड्या पाहिल्या का?"
दिवसाची सुरवात झाली!! ''साडी काय क्यूट रंगाची आहे ना. मला एक आश्चर्य वाटतं कुठल्याही रंगाची साडी असो, किंवा ड्रेस असो, हिला मॅचिंग बांगड्या मिळतातच कशा?".  ग्रुपला पडलेला महान प्रश्‍न!!
    ''नवरा हौशी असेल, देत असेल आणून". एक त्यातल्या त्यात भोळं उत्तर!!!
    '' काय बावळट आहेस, ती आहे चाळीशीची , नवरा असेल पंचेचाळीशीचा, लग्नाला अंदाजे तेरा चौदा वर्ष झाली असतील, एवढ्या वर्षानंतर बायकोला रंगिबेरंगी बांगड्या आणून देण्याइतकी हौस असेल त्याला? आम्ही तर बाई ऐकलय मोठा व्यावसायिक आहे म्हणून". विचारपूर्वक विश्लेषण!!
    ''मला वाटतं एखादा कासार हिचा खास जवळचा मित्र असेल. तो देत असेल प्रत्येक साडीवर मॅचिंग बांगड्या".  किडका सारांश!!!
एव्हाना माझा संयम संपून त्याची जागा संतापाने घेतली. मी जरबेने म्हणाले, "तुम्ही रोज तिच्यावर काय कॉमेटस्‌ करता? सासूवर टीका ठीक आहे. मुलांचे रोजचे विषय आणि चर्चासुध्दा ठीक आहे. साहेबांची निंदा ही क्षम्य आहे. पण रोज तिच्यामागे काय लागता? काय मिळतं त्यातून तुम्हाला? ती येऊन जेमतेम दोन महिने झालेत आणि..."
    माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मीनाने मला अडवलं, आणि म्हणाली "तेच म्हणते मी, ती येऊन जेमतेम दोन महिने झालेत आणि तुमची दोघींची एवढी मैत्री जमलीच कशी? बरोबर आहे. वाचनाची आवड, लिखाणाची आवड."
मीनाला अडवत स्मीता हसत हसत म्हणाली, "मीना, लिखाणाची काय म्हणतेस? साहित्याची म्हण बाई! साहित्याची आवड!"
     मी सुध्दा काही गप्प बसले नाही "तुम्हाला का राग येतो आमच्या मैत्रीचा? तुम्ही जर ग्रुप सोडून दुसऱ्या कुणाशी मैत्री केलीत तर मला त्यात काही वाटणार नाही बाई. प्रत्येकाच्या आवडी निवडीचा प्रश्न आहे. आहे आम्हाला दोघींना वाचनाची आवड. आणि काय गं तुम्हांला तिच्या साड्या - ड्रेस आणि तिच्या बांगड्या याच्या विश्लेषणात आख्खा लंच टाईम वाया घालवायला काहीच कसं वाटत नाही? दुसरे सगळे विषय संपले का?"
    मनातल्या मनात मात्र मी कडवटपणे म्हटलं "तुम्हाला नाही वाचनाची आवड, नाही लिखाणाची आवड, नाही कुठल्या समाजिक विषयात रस. येऊन जाऊन सारखा घरचाच विषय नाही तर टीका!! सदैव कुणावर ना कुणावर तरी टीका!!!" गेल्या दोन तीन महिन्यापासून अनू हा नवीन विषय त्यांना मिळालाच होता. अनू, तिचं सौंदर्य, चाळीशीतही तिने टिकवलेला बांधा, तिचे महागडे ड्रेस, साड्या आणि त्यावरच्या मॅचिंग बांगड्या.

    लंच टाईम संपला तो दुस-याच कुठल्यातरी विषयाने. कदाचित मला दुखवायचं नाही म्हणून त्या सर्वजणी गप्प बसल्या होत्या. कदाचित वाद वाढू नये म्हणून गप्प बसल्या होत्या. मला त्यात रस नव्हताच. मी कामाला सुरुवात केली खरी पण लक्ष लागेना. वाटलं ही किती कोती वृत्ती निर्माण झाली आहे या सगळ्यांमध्ये. कुणाला नावं ठेवल्याशिवाय यांचा दिवसच पूर्ण होत नाही. आणि अनुसारख्या व्यक्तीविषयी कुठल्याही सबळ कारणाशिवाय या सर्वजणी आकस कसा ठेवू शकतात?
    इतक्यात साहेबांनी मला हाक मारली. मी त्यांच्या टेबलापाशी जाऊन उभी राहिले.
    "अंजली दोन दिवसांनी महिना अखेर येतो आहे. दरवेळेप्रमाणेच या महिना अखेरही कामाचा ढीग उपसावा लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळी थांबावं लागेल, तुझी काही अडचण नाही ना?"
मी थोडी चक्रावलेच होते. साहेबांनी सांगायचं आणि आम्ही थांबायचं हे गेली काही वर्ष बिनबोभाट चाललं होतं. मग, तुझी काही अडचण नाही ना हे विचारण्याचं काय कारण होतं? मी उत्तर देणार इतक्यात साहेब म्हणाले "तुला एकटीलाच नाही, स्टाफ मधल्या प्रत्येकालाच व्यक्तीश: विचारुन ठेवतोय."
    मी हसून म्हटलं, "साहेब, ही कुठली प्रत्येकाला विचारायची नवीन पध्दत? आम्ही सर्वचजण नेहमीच महिना अखेरीच्या कामासाठी थांबतो नाही का?'' साहेबांनी आजूबाजूला पाहिलं, मला म्हणाले "बस जरा, तुला सांगतो तुझ्या मैत्रीणींचा जो ग्रुप आहे ना, त्यातल्याच काही जणींना प्रॉब्लेम झालाय"
     मी विचारलं "कुठला प्रॉब्लेम?"
    साहेब उत्तरले ‘त्या अनुश्री देशपांडे आल्या आहेत ना, त्यांची काहीतरी अडचण आहे म्हणून त्या प्रत्येक मंथएंडला रजा घेतात, तर या सर्वजणी मला भेटून विचारुन गेल्या की त्यांना विशेष परवानगी का देता म्हणून." 
मी त्यांना म्हणालो "मला सर्वजण सारखेच आहेत. तुम्हा कोणाला अडचण असेल तर तुम्हीही रजा घेऊ शकता."
साहेब शांतपणे बोलत होते खरे पण मनातून वैतागले होते.
    बरोबर आहे एखाद्या नव्यानेच आलेल्या स्त्री कर्मचा-याला, त्यातून सुंदर स्त्री कर्मचा-याला रजा दिल्याबद्दल कुणी काही तिरकं बोलायला लागलं तर ते वैतागणारच. 
    मी थक्क झाले होते!! या सर्वजणी तिच्या महिना अखेरीच्या रजेविषयी साहेबांना जाऊन भेटतात, त्यांच्याशी बोलतात हे सगळच धक्कादायक होतं. पण अनू तरी प्रत्येक महिन्याच्या शेवटी कशाला रजा घेते? एरवी या दोन तीन महिन्यातलं तिचं काम खरोखरीच वाखाणण्यासारखं होतं. प्रत्यक्ष साहेबांच्या तोंडूनच दोनतीनदा
कौतुक ऐकलं होतं. पण जेव्हा कामाचा सर्वात जास्ती ताण असतो तेव्हा रजा घेतली तर सर्वांच्याच डोळ्यात येतं हे तिच्या का नव्हतं लक्षात येत? आज संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर एकत्र जाऊ तेव्हा बोललं पाहिजे असं मी मनाशी ठरवलं.

चार साडेचारच्या सुमाराला स्मीता माझ्या टेबलापाशी आली. "अंजू दुपारी तुझा मूड गेला का गं?" स्मीता त्यातल्यात्यात समंजस म्हणावी अशी. अर्थात ती ही काही कमी नव्हती, पण निदान ग्रुप टिकून रहावा याच्या करता धडपडाची.
    "छे ग! मूड कशाला जाईल माझा?"
    "अनुश्री विषयी आम्ही बोलत होतोच आणि तुमच्या दोघींच्या मैत्रीविषयीही सगळ्यांनी नाराजी दाखवली म्हणून तू रागावली नाहीस ना?"
    मी जरा आश्चर्यातच!!! ही जरी त्यातल्यात्यात बरी असली तरी एखाद्या विषयी इतका विचार कधीपासून करायला लागली?
    "नाही ग मी नाही रागावले", मी वरवर म्हणाले.
    "असं कसं म्हणतेस ? तुझा चेहेराच इतका बदलला होता की आम्ही सगळ्यांनी ओळखलंच तू रागावलीस म्हणून".
    "हे बघ तुम्हाला तिच्याबद्दल बोलावसं वाटलं, तुम्ही बोललात. ठीक आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण टीका करतानाही आपण किती  घसरायचं याला काही लिमिट? सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनुमधली एकतरी गोष्ट अशी आहे का, ज्याचा आपल्याला त्रास होतो म्हणून आपण टीका करावी? सांग ना. तिचं बोलणं गोड आहे, ती कधीही कुणाला दुखवत नाही म्हणून तुम्ही परवा शुगर कोटेड क्विनाईन असं तिच्याबद्दल बोललात. काल साहेबांनी तिचं कौतुक केलं तेव्हा म्हणालात पुढेपुढे करते, दिसायला सुंदर आहे म्हणून तिच्या कामाचं कौतुक साहेब करतात"
    मला मधेच थांबवत स्मीता म्हणाली, "तेच तुला सांगायचय, ती वाटते साधी पण तशी मुळीच नाही. तुला पटणार नाही कदाचित पण सांगते. तू कामाचं बोललीस ठीक आहे. काम करते हे मान्य. पण प्रत्येक मन्थ एंडला साहेबांना व्यवस्थीत खिशात घालून रजा सॅक्शन करुन घेते."
    यावर मी गप्पच राहिले. नुकताच साहेबांपाशी विषय झाला होता ते सगळं आठवलं.
ठेवणीतला बारीक आवाज काढत स्मीता म्हणाली, "आजच तिचा परवाच्या सुट्टीचा अर्ज आलाय. आम्ही तो पाहिला आणि लंचच्या आधीच सगळ्या जणी साहेबांकडे जाऊन आलो. तिची रजा प्रत्येक महिन्याला कशी सॅक्शन होते ? ती कामसू आहे ना? मग महिन्यातलं सर्वात जास्ती काम असते तेव्हांच कशी चार दिवस रजा घेते?" स्मीताच्या चेहे-यावर मला निरुत्तर केल्याचा आनंद होता. ती पुढे म्हणाली "तू म्हणालीस ना टीका करताना किती घसरता म्हणून? पण खरच तिचा एक ठराविक कासार आहे. ती जवळजवळ एक दिवसाआड त्याच्याकडे जाते. आता मला सांग, हिचं आठवड्यातले तीनचार दिवस बांगड्यांच्या दुकानात जाऊन बांगड्या घ्यायचं वय आहे का? मग का जाते ती, सांग ना?"
    मी स्मीताला विचारंल, "तुम्हाला कुणी सांगितल गं ती दर दिवसाआड बांगड्या घेते ते?"
    "अगं आम्ही दोघी तिघी तिच्याच रस्त्याने जातो ना आम्ही तिच्यावर पाळत ठेवून ही बातमी काढली."
    मी थक्क !!!!
    पाळत वगैरे ठेवून बातमी काढायची म्हणजे..... हाच वेळ सत्कारणी नसता लावता आला? पण आयुष्यात गॉसिपिंग हेच ध्येय असेल तर काय करणार?
    स्मीता गेली पण मला बेचैन करूनच. वाटायला लागलं अनुला हे सर्व कळलं तर? तिची प्रतिक्रिया कशी असेल ? कुठल्याही कारणाशिवाय ऑफिसमधल्या बायकांनी सतत टीका करणं, साहेबांकडे जाऊन तिच्या तक्रारी करणं, आणि हे सर्व कमीच की काय म्हणून तिच्यावर पाळत ठेवून तिच्या बद्दलच्या बातम्या काढणं.
    संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर पाकींग पर्यंत एकत्र चालायचं हा आम्ही एकमेकीच्या मैत्रीत पडल्यावरचा शिरस्ताच झाला होता. तिची स्वत:ची गाडी ड्रायव्हर आणून उभी करायचा तिथपर्यंत गप्पा मारत जायचं, हे आता रुटीनच झालं होतं. आमच्या दोघींच्या सर्वच आवडी निवडी, जुळत होत्या असं नाही. पण मनाच्या तारा मात्र जुळल्या होत्या. कितीतरी विषयांवरच्या गप्पा, चर्चा. तिचं वाचन अफाटच.कुठल्या कुठल्या पुस्तकांविषयी मला सांगायची.
    आज मात्र माझी चिडचिड मी लपवू शकले नाही. जिना उतरता उतरता अनु म्हणाली, "काय गं अंजली काय झालं?"
    "कुठं काय झालय ?"
    "अगं चेहेरा किती उतरलाय, साहेब काही बोलले का? नाही, साहेबांच्या टेबलाशी मला दिसली होतीस म्हणून विचारलं.."
    "नाही ग साहेब नाही काहीही बोलले. माझ सकाळपासूनच डोक दुखतंय म्हणून चेहेरा असा वाटतोय तुला."
    तिच्या गाडीपर्यंत जाऊन पोचल्यावर मी लगेचच जायला निघाले. त्यावर ती म्हणाली "हे काय? थांबत नाहीस रोजच्यासारखी?"
मी म्हणाले, "नको अगं मला घरी लवकर पोचायचय."
"मी सोडू का गाडीतून?"
"नको नको, माझी मी जाईन", असं म्हणत मी पुढे निघाले, चार पावलं पुढे गेल्यावर काय वाटलं कोण जाणे, गर्रकन मागे वळून परत तिच्या गाडीपाशी जाऊन म्हणाले, "अनू या बांगडया कुठे मिळाल्या तुला?" 
    तिला माझं ते विचारणं खटकलं की काय कोण जाणे पण तिचा चेहेरा खरकन उतरला. ती म्हणाली "केवळ हे विचारायला मागे वळून आलीस? अगं माझं एक ठराविक दुकान आहे बांगड्यांचं, तिथे मला अगदी हव्या तशा रंगाच्या बांगड्या मिळतात. पण तुला अचानक माझ्या बांगड्यांची कशी काय आठवण झाली?"
माझ्या डोळ्यासमोर मीना, स्मीता आणि तो सगळा ग्रुपच होता. मी अनुला सांगितलं "अनू, कुठल्याही परिस्थितीत या मंन्थएन्डला तू रजा घेऊ नकोस, प्लीज माझी विनंती आहे तुला."
    आता मात्र गाडीत बसलेली अनू बाहेर आली, "अंजु,अग काय झालं, मगाशी बांगड्यांचं, मागे येऊन विचारलस, आत्ता, काहीही विषय निघालेला नसताना मन्थएंडच्या रजेचा विषय कशाला काढलास? काही प्रॉब्लेम झालाय का?"
    मी जरा गडबडलेच "म्हणाले तसा काही प्रॉब्लेम नाही झालाय पण.. तू येशील ना मन्थएन्डला?"
    तिचा चेहरा उतरला होता, पार रंग उडाला होता चेह-याचा. 
    "मला शक्‍य नाही"
    "अगं, पण का शक्‍य नाही? तुला उशीरा पर्यंत थांबण शक्‍य नसेल तर थांबू नको पण निदान ऑफीसला ये".
    "मला शक्य नाही"
    मी चिवटपणे तिला म्हणाले "आजपर्यंत आपण एकमेकींच्या घरचा विषय कधीच काढला नाही. खाजगी विषय सोडून कायम बोलत राहिलो. पण मला एक सांग, तुझी काही अडचण आहे का?"
    "मला शक्‍य नाही" तिचं तेच उत्तर.
    आता मात्र मला तिचा रागच आला. मी एवढी परोपरीने सांगत असूनही ती, "मला शक्‍य नाही" या वाक्‍याशिवाय काही बोलायला तयार नव्हती. शेवटी कसाबसा तिचा निरोप घेऊन मी निघाले.
    रात्री तिचा फोन आला. 'मी रागावले नाही ना' विचारणारा, तो मी जेमतेम परतवून लावला.
    दोन दिवस कामही प्रचंड होतं आणि आम्ही दोघी एकमेकींशी नेहमीसारख्या बोलतही नव्हतो. एकदा वाटलं दुस-या कुणाच्या सांगण्यावरुन आपण आपलं मत बनवणं किंवा आपल्या नात्यामध्ये दुरावा आणणं कितपत योग्य होत? एकदा वाटलं इतरांच्या सांगण्याचा प्रश्‍च नाही, पण माझ्या सांगण्यावरुन एखाद्या माहिनाअखेरीस ही ऑफीसला आली तर काय बिघडेल? माझी इतकी छोटी अपेक्षा,अपेक्षा शब्दाशी थोडी दचकले. कारण अपेक्षा आली की मैत्रीचा कस कमी होतो यावर अनुचं नी माझं एकमतं झालं होतं.
    महिना अखेर !!!!!! कामाचा प्रचंड ताण!!!! ऑफिसच्या वेळेनंतरही आम्ही माना मोडून काम करत होतो. मी काम संभाळता संभाळता आमच्या ग्रुपची अनुवरची जोरदार टीकाही सोसत होते.  
बरोबर ते चार दिवस पूर्ण झाल्यानंतर अनु आली!! रेशमी साडी त्यावर नेमक्या त्याच रंगाच्याबांगड्या, केसात गजरा.आल्यावर तिची कामाला चटाचट सुरवात झाली. मी मात्र लांबून हे सर्व पाहात होते. लंचटाईम मध्ये सरसकट सगळ्यांनी तिची आजची साडी, बांगड्या, महीना अखेरीस घेतलेली रजा, या सगळ्यावर भरपूर टीका केली.
    मी गप्पच होते. घुश्यात होते.
    ऑफीस सुटायच्या आधीच, ती माझ्या जवळ आली. '" अंजू रागावली आहेस ते कळतय मला".
    "छे,मी नाही रागावले."
    "अंजू प्लीज, या दोनच महिन्यात तू आणि मी एकमेकींच्या इतक्या जवळ आलो आहोत. तू रागावलेली मला नाही का कळणार?"
    मी तिची नजर चुकवली.
"आज माझ्या घरी येशील?"
"नाही गं, घरी जायला उशीर होईल. मुलं वाट बघतील."
"मग उद्या येशील?"
"मी असं सांगू शकत नाही यायला जमेल की नाही ते."
 तिचे डोळे पाण्याने भरले होते.
"मी कुणाला कधीच काही सांगितलं नाही. पण तुझा राग मला सहन होत नाही. आणि आपली मैत्री तुटणं तर नाहीच नाही. उद्या तुला तू विचारलेल्या आणि न विचारलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरं मी माझ्या घरीच देईन."
दुस-या दिवशी पाळणाघरात उशीरा येण्याबद्दल सांगून आले. संध्याकाळी तिच्या गाडीत बसताना माझ्याच नकळत, मी, कुणी बघत नाही ना हे पाहून घेतलं. स्मीता, मीना नेमक्या बाजूनेच चालल्या होत्या. त्या हसल्या, बहुतेक कडवटपणे.
    कोरीव काम केलेला दरवाजा पाहूनच घर कसं असेल याची मला कल्पना आली. तिच्या जवळच्या चावीने तिने दार उघडलं. पाय रुततील असा उंची गालिचा, उंची पडदे, महागडं फर्निचर जे जे काही म्हणून वैभव असायला हवं ते सर्वच होतं.
    "चल अंजू तुला सगळ घरं दाखवते". मी तिच्यामागे जात सर्व घर पाहिलं. दिवाणखाना, स्वयंपाकघर, तिची बेडरुम, पाहुण्यांसाठी खोली. दिवाणखान्यातून एक चकचकीत जिना वरती जात होता. तिने मला वरती नेलं.
इतक्यात कानावर जोरदार किंकाळी ऐकू आली.
    "आई!! आई!! आई आली!!!!"
    मी आत शिरले, पाहाते तो समोर पलंगावर एक अस्ताव्यस्त पसरलेली तेरा चवदा वर्षाची मुलगी, डोळ्यात वेडसर झांक. तोंडातून गळत असलेली लाळ. केस पसरलेले. चेहेरा मात्र अनूचाच. तसाच स्वच्छ गोरा वर्ण, मोठे डोळे, कुरळे केस, सरळ नाक.
    माझे हात पाय कापायला लागले होते, शरीर थंड पडलं होतं.
अनु पलंगावर बसली. तिने तिची लाळ रुमालाला पुसली, केस हातानेच सारखे केले, तिची पापी घेतली,तिला म्हणाली "शोनू,ही अंजू मावशी हिला नमस्ते कर."
    अडखळत ती मुलगी म्हणाली ''मावशी,मावशी, आई माझ्या बांगड्या?"
 मी पाहातच राहिले!!! सकाळी अनुच्या हातात असलेल्या बांगड्या एका नव्या-को-या खोक्यात होत्या, तो खोका अनुने तिच्या हातात देत म्हटलं. "शोनू नवीन बांगड्या आणल्या हं"
त्या दोघींचा बांगड्यांचा वीड सारखाच होता. अनूने त्या बांगड्या तिच्या हातात घातल्या. माझ्याकडे पाहात म्हणाली "अंजू ही माझी लेक कोमल"
माझं अनूकडे पाहायचं धाडसच होत नव्हतं. त्या पलंगावर मी कशीबशी बसलेली होते. कोमल अनूला चिकटून बसली होती. मधेच तिचे पापे घेत होती.
    मी नि:शब्द होते!!!!
इतक्यात अटॅच्ड बाथरुम मधून एक पन्नाशीच्या बाई बाहेर आल्या . त्या अनूला पाहून म्हणाल्या, "हिने सकाळपासून फक्त चहा प्यायलाय आणि दोन बिस्कीट खाल्लीत."
    "ठीक आहे, तुम्ही खाली जा आणि स्वयंपाकाच पहा. आमच्यासाठी चहा ठेवा आणि हो, तुमच्यासाठीही ठेवा बर कां."
    ती बाई मान डोलावून खाली निघून गेली .
    "हं आता बोल अंजू, आता या काकू स्वैपांकाचं बघता बघता आपल्याला मस्तपैकी चहा आणून देतील. तू अशी अवघडली का आहेस? बस ना व्यवस्थित."
    मी जेमतेम स्वत:ला सावरत म्हटलं, "अनु, मला हे माहिती नव्हंत."
    अनु हसत म्हणाली ''मी सांगितलच नव्हंत तर तुला कसं कळणार होतं?"
    "कोमल कधीपासून अशी आहे?"
    "जन्मत:च, फक्त सुरुवातीला लक्षात नव्हतं आलं. जेव्हा उभं राहायचं वय झालं. तेव्हा ही पायावर उभीच राहायची नाही. आणि उभी राहिली ती फेंगडी. तरी एक दोन महिने लक्षात नव्हतं आलं. नंतर माझ्या आईच्या लक्षात आलं की हिचं सगळंच वेगळ आहे म्हणून". 
काहीतरी विचारायचं म्हणून आपलं मी विचारलं "कुठली ट्रीटमेंट वगैरे नाही का दिली?"
    "कुठलीही पॅथी, मी सोडली नाही. आयुर्वेद झालं. गव्हांकुराचा रस झाला.अनीशने, म्हणजे माझ्या नव-याने तर त्याचे लंडन मधले बिझीनेस कॉन्टॅक्टस वापरुन तिथपर्यंत हिचे रिपोर्टस्‌ं पाठवले पण कशालाही यश आलं नाही. एकच सत्य होतं, ते हे, की ही अशीच राहणार, कायमची!!!!!"
मग त्यातल्या त्यात तिचं आयुष्य सोपं व्हावं, तिला तिचं स्वत:च स्वत:ला सर्व करता यावं, यासाठी मसाजिस्ट ठेवला तो तिचे पाय चोळून देतो. अनेक वर्षे तो येतोय. या काकू खाली गेल्या ना त्या माझ्याकडेच राहतात, कायमच्या. त्यांचं खाणंपिणं, कपडालत्ता, औषधपाणी अगदी सणावाराच्या खरेद्यासुद्धा मी करते. माझ्या कोमलचं प्रेमाने करतात. मुख्य म्हणजे तिचा तिरस्कार न करता करतात याचे पैसे मी मोजते."
    अनु हे सर्व शांतपणे सांगत होती, भावनाविवश न होता बोलत होती. काल माझ्या रुसव्याने डोळ्यात पाणी आलेली अनू, तिच्या पोटच्या गोळ्याच्या दुखण्याविषयी बोलताना शांत कशी होती? कदाचित तिचं खूप रडून झालं होतं. त्या विषयापुरतेतरी अश्रू संपले होते. 
    कोमल माझ्याकडे पाहात होती, मध्येच अनूकडे पाहात होती, मध्येच म्हणायची, "आई माझ्या बांगड्या".
काहीतरी आठवल्यासारखं करत अनू म्हणाली, "हिच्या बांगड्यांची गंमत सांगते. ही लहान होती तेव्हा मी कधीच बांगड्या वापरत नव्हते. प्रचंड आवड असूनही वापरत नव्हते. वाटायचं ही इतकी नाजूक, चुकून त्या फुटल्या, कुठे काच पायात गेली तर काय घ्या. पण या काकू कामाला यायला लागल्या. नंतर तर कायमच्याच राहायला आल्या. त्यांच्या बांगड्या हिला आवडायला लागल्या. त्या बांगड्यांच्या किणकिणाटाची तिला गंमत वाटायला लागली. हळूहळू तिचं बांगड्यांच वेडं वाढतच गेलं.प्लास्टिकच्या आणलया तर चालायच्या नाहीत. तो फरक कळण्याइतकी बुध्दी तिला आहे. शेवटी अनीशने सर्व घरात वूलन कार्पेटस्‌ आणून टाकली.निदान खाली पडून बांगडी फुटायला नको. म्हणून जेव्हा मी ऑफिसला यायला लागले"........
तिला मधेच तोडत मी म्हटलं, "हिला सोडून तू कशी काय ऑफिसला यायला लागलीस?"
    "सुरुवातीला तर हिचं निदान झाल्यावर मी राजीनामाच तयार ठेवला होता. पण अनीशने माझा तो निर्णय मला बदलायला लावला. माझं बी पी वाढायचं. सारखी विचार करत बसायची. वाटायचं हिचं कसं होणार? विचार करून वेड लागायची पाळी आली. शेवटी या काकू कायमच्या राहायला तयार झाल्या आणि दोन वर्षांच्या लांबलचक रजेनंतर मी ऑफिसला जायला लागले. तेव्हापासून रोज संध्याकाळी बांगड्या आणायचा शिरस्ताच पडला."
    कोमल पुन्हा म्हणाली, "आई माझ्या बांगड्या".
    मी पटकन पुढे होत तिचा हात हातात घेत म्हटलं ''शोनू तुझ्या बांगड्या छान छान आहेत". यावर कोमल लाळ गळेपर्यंत हसली. अनूच्या हातातला रुमाल घेऊन मी ती हळूवारपणे टिपली.
    "परवा तुला नाही का सांगितलं माझं एक ठराविक दुकान आहे. तो मला कुठल्याही रंगाच्या बांगड्या मिळवून देतो. देव कशात काय ठेवतो पाहा ना. कोमलला बांगड्याच्या रंगातला बारीक फरकही कळतो आणि परवाच्याच बांगड्या उद्या नवीन म्हणून आणून दिल्या तर त्या ती चिडून फेकून देते."
    "अनू तुझी खरच कमाल आहे. तू तुझ्या चेहेऱ्यावरूनधीच काही दाखवलं नाहीस. तू कायम चेहेरा, प्रसन्न, आनंदी ठेवलास."
    "अगं मी नुसता चेहेराच आनंदी नाही ठेवत. मी प्रामाणिकपणे सांगते, कोमलच्या या दोषाला आयुष्यातलं एक सत्य म्हणून मी स्वीकारलय आणि त्या सह मी आनंदी आहे, प्रसन्न आहे."
    "You are simply great." 
    “नाही नाही, मी नाही. अनीश is simply great. जगण्याचा हा मार्ग त्याने मला दाखवला. हे बांगड्यांचं वेड कोमलला लागलं तेव्हा मी कपाटात रचून  ठेवलेल्या रेशमी साड्या, महागडे ड्रेस त्याने मला बाहेर काढायला लावले,आणि म्हणाला, ''प्रत्येकावर बांगड्या विकत घे. त्या घालून ऑफीसला जा. संध्याकाळी त्याच बांगड्या बॉक्समध्ये घालून कोमलला देत जा. नाहीतरी तुमचं माप सारखंच आहे. तू तुझं सगळं तरुणपण, हौस, सगळ्या आवडी निवडी विसरुन गेलीस तर तुझं स्वतःचं व्यक्तीमत्व करपून जाईल. तसं करू नकोस. कोमलच्या प्रॉब्लेममुळे आपण कायमच रडत बसायचं नाही."
    "तुला सांगते अंजू त्याचा एवढा मोठा बिझीनेस आहे तो सांभाळूनही तो कोमलसाठी रोज वेळ काढतो."
मी भारावल्या सारखी ऐकत होते. वाटत होतं हिच्याकडे पाहून चुकूनही कधी वाटलं नसतं की हिने एवढं सगळं सोसून त्यावर ही मात केली आहे. आणि ज्यांनी कधी कुठलं दुःखच पाहिलं नसेल त्यांना हे विचार कसे हो झेपणार?
आमच्या ग्रुपने हे एवढं ऐकूनही कदाचित म्हटलं असतं, "पहा काय कमाल आहे. अशी लोळागोळा झालेली तरुण मुलगी घरात टाकून ही बया नटून थटून ऑफीसलायेतेच कशी?"
    इतक्यात चहाचा ट्रे घेऊन काकू आल्या. चहा घेता घेता अनू म्हणाली,"ही बारा वर्षाची झाली आणि निसर्गाने नको त्या बाबतीत मात्र तत्परता दाखवून महिन्याचा तो त्रास हिच्या मागे लावून दिला. हिची तब्येत त्या चार दिवसात मात्र तोळामासा होते. तिची चिडचिड वाढते."    
    अनूने उठून जिन्याच्या तोंडापाशी जाऊन काकू खाली गेल्याची खात्री केली आणि हळूवारपणे म्हणाली "एरवी काकू कोमलचं प्रेमाने करायच्या. पण या चार दिवसात मात्र त्यांचीही चिडचिड व्हायला लागली. विशेषतः अस्वच्छ कपडे धुताना त्या नाराजी दाखवायच्या. शेवटी ठरवलं,आपलं मूल आहे. एरवी त्या सांभाळतात, प्रेमाने करतात, खूप झालं. ते त्यांची काहीतरी अडचण आहे ते चार दिवस मात्र मी सांभाळते, म्हणूनतर मी रजा घेते, नेमके ते चार दिवस मंथएंडला येतात".
मी अवाक झाले होते. तिच्या 'मला शक्य नाही' चा अर्थ असा उलगडला होता. 'चार दिवसांनंतर मी पाचव्या दिवशी जेव्हा ऑफिसला येते तेव्हा कोमल खूप उदास असते. एक दोन दिवस अन्नाला स्पर्शही करत नाही. मगाशी काकूंनी सांगितलेलं ऐकलंस ना, सकाळपासून फक्त चहा बिस्कीटावर आहे ते? मग मी संध्याकाळी घरी आल्यावर तिच्यापाशी सतत बसून असते. तिला भरवते." कोमलच्या चेहरा निर्विकार होता. डोळ्यात भावहीनतेची छटा होती. सारखी आपली बांगड्या कुरवाळत होती. आता हळूहळू मलाही स्पर्श करून माझ्या चेहऱ्याकडे पाहात होती.
अचानक अनू विषय बदलत म्हणाली, "अगं तुला माझं पुस्तकाचं कलेक्शन दाखवायचं राहिलं. चल ना तुला दाखवते. शेजारच्याच खोलीत मी ते ठेवलंय. कोमल खेळत बसते तेव्हा मी वाचत बसते."
    मी गुदमरून गेले होते,आणि डोळे विस्फारून माझ्या शेजारी बसलेल्या त्या तेजस्वी शलाकेकडे पाहात होते. काय नव्हतं माझ्या त्या नजरेत? आदर, भारावलेपण, प्रेम आणि दाटून आलेलं विलक्षण ममत्व. 
त्या माझ्या नजरेचा अर्थ ओळखत अनु हसली आणि थोडसं थांबून मिस्कीलपणे म्हणाली, "आता कुणी काही माझ्याविषयी बोललं तर माझ्यावर रागावणार नाहीस ना?"
    मी आश्चर्याने पाहातच राहिले. "तुला कुणी सांगितलं तुझ्याविषयी माझ्यापाशी कुणी बोललं म्हणून?"
    ती म्हणाली "ते महत्वाचं नाही. पण तू रागावणार नाहीस ना?"
    
    मी तिचे दोन्ही हात हातात घेऊन फक्त हसले.

Sep 9, 2020

रिडेव्हलेपमेंट

श्री सरस्वती प्रसन्न

@योगिनी श्रीनिवास पाळंदे 

                रीडेव्हलपमेंट
होमाच्या धूराचा सुगंध चितळयांच्या नाकाला विलक्षण सुखावत होता. त्यांची नजर हॉलच्या भिंतीवर लावलेल्या विजयाताईंच्या तसबीरीवर खिळली होती.
“काका,चहा!!” विलक्षण आर्जवाने अंजूने चहाचा वाफाळता कप काकांच्या हातात दिला आणि परागला म्हणाली,
“पराग,अरे काकांना बागेत नेऊन आणलंच नाहीयेस.काकूंच्या नावाचा बाक आपण बागेत बसवलाय ना तो काकांना दाखव की."
वाकलेल्या काकांचा हात धरून परागने बागेत प्रवेश केला तेव्हा तिथे बसलेल्या जुन्या शेजाऱ्यांच्या,आणि काकांच्या मित्रांच्या नजरा आपल्यावर खिळल्या आहेत याच्या जाणीवेने तो खूष झाला.

 अगदी समोरच बसलेले जुने शेजारी, जोशी,तोंडभरून हसले आणि म्हणाले
 “'या या चितळे,बागेत पहिल्यांदाच येताय वाटतं?"चितळयांनी हसून मान डोलावली .

“जोशीकाका तुमच्या समोरचा बाक आहे, तोच आहे ना काकूच्या नावाचा?"
नाव स्पष्ट दिसतच होतं !!!
कै विजया रामचंद्र चितळे यांच्या स्मरणार्थ श्री रामचंद्र चितळे यांजकडून आणि कंसामध्ये लिहिलं होतं सौजन्य, पराग भालचंद्र चितळे!!!
 पत्नीच्या स्मरणाने क्षणभर गहिवरलेल्या चितळयांना, कंसातल्या परागच्या नावाच्या उल्लेखाने खुदकन हसूच आलं!!!

दाबलं त्यांनी ते !

 तशी,चेहे-यावरचा भाव लपवायचा अभिनय करायची सवय, त्यांना विजयाच्या निधनानंतर एखाद्या वर्षात लागलीच होती .
ती गेल्यावर आलेलं एकाकीपण,एकटेपण,
आणि ते सुध्दा चाळीतल्या जुन्या जागेत नव्हे, तर रीडेव्हलपमेंटसाठी चाळ पाडल्यानंतर दिल्या गेलेल्या
तात्पुरत्या ब्लॉकमधे!
तिथे ते एकाकीपण अधिकच वेदनादायी झालं होतं.
आणि विजयाचा अचानकपणे आलेल्या आजारात  मृत्यू झाला!!!
तसा अकालीच म्हणायचा....
गेली तेव्हा तिचं वय होतं  अडूसष्ठ,
 पणं तशी हल्ली जगतात की माणसं ऐंशीपच्याऐंशी पर्यंत ! 
पण, विजया, मूल नसल्याचं दु:ख
जे जन्मभर वागवत आली होती, ते जुनी चाळ पाडल्यावर अधिकच गहिरं  झालं होतं .
नवीन ब्लॉकमध्ये जुने शेजारी नाहीत, 
"काकू,आजी,मावशी" अशा हाका मारत येणा-या शेजारपाजारच्या चिमण्या नाहीत.

त्यात तो आजार आला......तिला संपवूनच गेला !

कुणी कुणी आलं नव्हतं तेव्हा.
भाचे, पुतणे, पुतण्या कुणी म्हणून आलं नाही .
 चाळ पाडल्यानंतर,नवीन जागेत जाते वेळच्या शिफ्टींगला नाही, आणि विजयाच्या आजारपणात तर नाहीच नाही.तसे एखाद्यावेळी हॉस्पीटलमधे आणि नंतर दिवस-कार्याच्या
वेळी तोंड दाखवून गेले सगळे!
एकाकीपणाच्या गर्तेत चितळे मात्र कुढत राहिले, रडत राहिले
आणि अभिनय मात्र करत राहिले संयमाचा !

विजया गेल्यानंतर पहिला सण आला दिवाळीचा , नाईलाज झाल्यासारखा एक भाचा येऊन गेला,विकतच्या फराळाचं छोटं पार्सल देऊन गेला, 
परगावी जाणार असल्याचा पुतणीचा फोन येऊन गेला....म्हणजेच ती काही येणार नव्हती.
“खरं म्हणजे आमची सुध्दा दु:खी दिवाळी, पण सायलीला अभ्यास करताना सारखं तोंडात टाकायला काहीतरी लागतं म्हणून चकल्या लाडू आणल्या विकत, म्हणून
आणलंय थोडं थोडं दिवाळीचं,
तुमच्यासाठीसुद्धा असं,
 न मागितलेलं स्पष्टीकरण देऊन पराग अंजू येऊन गेले .

अगदी प्रथमच चितळे परागला म्हणाले.
" दिवाळीत घर खायला उठतंय रे.फार एकटा पडलोय मी"
ह्या वाक्यावर क्षणात अंजली म्हणाली ,"सायलीची दहावी आहे ,
नाहीतर नेलं असतं तुम्हाला.आणि तसं आमचं घर लहानच पडतं हो."
परागने अर्थातच हो ला हो मिळवलान.
घरात एकही दिवा न लावता चितळे बाहेरची रोषणाई पाहात राहिले . 
वर्षानुवर्ष काकूंच्या हातच्या,तोंडात विरघळणा-या चकल्या,ओठांनी खावा असा बेसनलाडू,याचीसवय लागलेली.
चितळ्यांनी फराळाची पार्सलं स्वैपाकाच्या काकूना देऊन टाकली.
 नाही म्हणायला समोरच्या चाळीतल्या रानडे वहिनी,दुःखी दिवाळी म्हणून विजयाताईंची आठवण ठेऊन रवा लाडवांचा डबा देऊन गेल्या होत्या.
 त्या लाडवातला तुकडा मात्र त्यांनी तोंडात टाकला.

असेच दिवस जात राहिले, जुन्या चाळी पाडून एव्हाना चार वर्षे झाली होती आणि विजयाला जाऊन दोन.

भयाण एकाकीपणा, रिकामेपणा, वयाने गात्रात वाढत चाललेला थकवा या सा-याला तोंड देत चितळे दिवस ढकलत होते.

दिवसातून दोन वेळा दरवाजाची बेल वाजे.सकाळी स्वैपाकाच्या काकूंची, आणि दुपारी केरफरशी धुणीभांडी करणारी बाई यांनी वाजवलेली.

या सा-यांमधे आधार होता तो अधूनमधून येणा-या जुन्या चाळीतल्या शेजाऱ्यांच्या फोनचा.
 खरतर फोनवर चितळयांच्या चौकशीपेक्षाही, बिल्डरने घातलेल्या नवीन अटी आणि कुणा अडेलतट्टू भाडेकर्यांनी आणलेल्या स्टे ऑर्डर याचीच चर्चा जास्त चाले.

एकुणातच काय,तर रीडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा पार बोर्या वाजला होता.

 टॉवर्स, ब्लॉक्स, लायब्ररी,तिथला बगीचा, जेष्ठासाठीच्या सुविधा...... सारीसारी स्वप्नं धूसर व्हायला लागली होती.
आणि एके दिवशी सकाळी सकाळी जोशींचा फोन आला!
" 'प्रतिक्षा संपली!!!!!
सामोपचाराने वाद मिटले.
दोन आठवडयात ऍग्रीमेंट फायनल होतंय. वर्षाच्या आत नवीन-वास्तू उभी राहाणार बरं का चितळे”

 चितळेंना आनंदच वाटेना!!!

 त्यांना स्वत:च्या कोरडेपणाचंआश्‍चर्य वाटत होतं.
 एकेकाळी विजयासोबत याच वास्तूची स्वप्नं पाहिली होती !
संभ्रमावस्थेत ते असतानाच बेल वाजली.
 बेल नेहेमीची नव्हती,कारण स्वैपाकाच्याकाकू तर येऊन गेल्या होत्या.
आश्‍चर्य करत त्यांनी दार उघडलं तर समोर पराग !
हातात गरम गरम उपम्याचा डबा, सोबत घरी केलेले रवा लाडू “काका पहिलं खाऊन घ्या गरमगरम."
त्यांच्या हातात डीश देऊन पराग बेधडकपणे स्वैपाकघरात घुसून चहा करायला लागला. 
काकांच्या हातात चहाचा कप ठेवत त्याने थेट विषयाला हातच घातला.
“काका काय म्हणतोय बिल्डर?पुढच्या आठवडयात अँग्रीमेंट होणार ना?"
आपल्याला काळजीपूर्वक सह्या कराव्या लागणार आहेत बरं का?” 
आपल्याला या शब्दापाशी चितळयांना ठसका लागला
त्यांना नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना.
पराग बरंच काही बोलत राहिला, ज्याकडे त्याचं लक्षही नव्हतं.
 अचानक त्यांच्या कानावर एक वाक्य पडलं.
“अंजू म्हणतेय पुरे झालं काकाचं एकटं राहाणं!
गाडीत घालून घरी घेवून ये त्यांना”
 काकांना विजया गेल्यावरची पहिली दिवाळी आठवली.
त्या दिवसभरात  योगायोगाने  ब-याच भाच्या, पुतण्यांचे फोन येऊन गेले,तब्येतीची चौकशी करणारे.
एकेदिवशी दुपारी....“तुम्हाला आवडतात म्हणून थालीपीठ पाठवल्येत हिने आणि सोबत घरचं लोणीसुध्दा पाठवलंय हो" असं सांगत एक भाचा आला.

 दोन तीन दिवस विचारांच्या कल्लोळात सापडलेल्या चितळयांना अचानक एक गमतीशीर, सुखावणारा शोध लागला होता.
आणि त्यानंतर मात्र ते विलक्षण खूष झाले.
आयुष्यातल्या इतक्या वर्षात हरवलेल्या  सुखाची गुरूकिल्ली  त्यांना सापडली होती.

त्या आठवडयात फोनला आणि दारावरच्या बेलला उसंत मिळाली नाही.
 कुणी “सहजच आलो होतो या बाजूला, म्हटलं भेटावं काकांना" अशी स्पष्टीकरण देत होतं.
कुणी लुसलुशीत घावन आणि ताज्या चटणीचा डबा घेऊन येत होतं.
चितळयांना आता मात्र गुदगुदल्या होत होत्या.
इतक्या दिवसांचा कंटाळा,उदासी,
मरगळ,एकटेपणा,इतकच काय पण शारिरीकव्याधी सुध्दा आता त्यांना भेडसावत नव्हत्या. 

मनातली कटुता आणि शंकाना दूर सारत त्यांनी जराही आढेवेढे न घेता, येणा-या सुखाला  स्वीकारायचं ठरवलं.
आणि एका रविवारी... परागने कमालच केलीन.
"यापुढे नाही एकटं ठेवणार तुम्हाला,आता वय झालं तुमचं.
सायली मोठी झाली आहे. बारावी असली म्हणून काय झालं!तिचा अभ्यास ती लायब्ररीत जाऊन करू शकते” असं त्यांच्या जुन्या जखमेवर मलम लावत स्वतःच म्हणाला.
दोन दिवसात सामानाची बांधाबांध करून त्याने गाडीत घालून चितळयांना स्वत:च्या घरी आणलं.

नात्याची ही रीडेवल्पमेंट चितळ्यांना सुखावून गेली, जरी त्याला निस्वार्थीपणाचा सुगंध नव्हता तरीही !
ऑँग्रीमेटचा दिवस जवळ येत चालला तसे स्वैपाकघरातल्या फोडण्यांचे दरवळ वाढले.
चितळ्याना स्वतंत्र खोली बहाल झाली होती.त्यांच्या आवडीनिवडी सांभाळून स्वैपाक होत होता. गरमागरम ताज जेवण,त्यांच्या औषधांच्या वेळा,सगळं सांभाळलं जात होतं.
त्यांना सामील करून घेत गप्पा होत होत्या.
 सुखाच्या लाटेवर स्वार झालेल्या चितळयांना वास्तवाचं भान मात्र सुटलं नव्हतं.
 त्यांचा आणि जोशींचा रोज फोन चाले.
घरातल्या डेव्हलपमेंटस ते जोश्यांना वेळोवेळी कळवत होते.
जोशींनी मात्र स्पष्ट सल्ला दिला,
"अँग्रीमेंट तुमच्याच नावाने करा, आणि विल मधे मात्र परागचं नाव टाका. नाहीतरी इतर भाच्या पुतण्यांपेक्षा तोच तुमचं करणार असं 
एकूण लक्षण दिसतंय.बाकी सगळी कायदेशीर मदत मी तुम्हाला करतो.अहो आपल्या रानडयांचा पुतण्या वकील आहे. तो हीच कामं करतो.तुम्ही निश्‍चिंत रहा?"

फोन ठेवता ठेवता मिस्कीलपणे हसून जोशी म्हणाले “अहो पुतण्या आहे म्हणुन विचारतोय,झेलतोय.
आमच्याकडे चिरंजीव आणि सूनबाई ब्लॉक ताब्यात घ्यायला नाचतायत,
पण,आम्हाला थालीपीठ घावनांचा 
खुराक नाही हो तुमच्यासारखा!!”
जोश्यांसोबत चितळे खो खो हसले.
आयुष्यात प्रथमच नि:संतान असल्याचा आनंद त्यांना झाला होता.
परागच्या मित्राच्या आणि अर्थातच जोश्यांच्या सल्ल्याने ऍग्रिमेंट झालं,आणि त्यासोबत विलसुद्धा!!!

विलची मूळ प्रत जोश्यांच्या ताब्यात होती.परागला ती प्रत पाहीपर्यंत काही जीवातजीव नव्हता.
शेवटी, मनोमन धास्तावलेल्या परागला त्यांनी मूळ प्रत दाखवुनच टाकली.विल वाचतानाचे त्याच्या चेहेऱ्यावरचे विविध भाव पाहून चितळ्याना पुन्हा गुदगुदल्या झाल्या.

विल वाचायच्या दिवशीच,सुखावलेल्या परागने घोषणा  केलीन"काका, नवीन बांधकामात आपल्याला एक बगिचा सुद्धा बांधून मिळणार आहे,आणि बिल्डरने आवाहन केलंय की कुणाला कुणा दिवंगताच्या नावाने काही देणगी द्यायची असेल तर तिथल्या बाकांवर त्यांचे नाव दिलं जाईल,तर मी आणि अंजूने ठरवलंय,काकूच्या स्मरणार्थ एक बाक बसवून घ्यायचा, ज्याला तिचं नाव दिलं जाईल.“
म्हटल्याप्रमाणे वर्षभरात बांधकाम पूर्ण झालं. ब्लॉकमध्ये पराग,अंजली, सायली राहायला येणार हे देखील ठरलं.माफक फर्निचर झालं.

शिफ्टिंग, सामानाची लावालावी, यातलं चितळ्याना काहीही बघायला लागलं नाही.
एखाद्या फुलासारखे अलगदपणे ते नवीन जागेत शिरले होते.

आज घराच्या वास्तुशांतीनंतर,
बागेमध्ये शिरताना,त्यांना सगळं सगळं आठवत होतं.
त्या बाकावर टेकताना त्यांना विजयाताईची आठवण आली,क्षणभर ते गहिवरलेही, पण हळवं व्हायचं नाहीच मुळी असं त्यांनी स्वतःला बजावलं होतं.
  त्या परिसराशी निगडित असलेल्या सर्व आठवणींनी मनात फेर धरला होता.
जुनी वास्तू स्वतःला जमिनीच्या पोटात घालून,नव्याने जमिनीवर उभी राहिली होती.आता फक्त बरकत होती,
भरभराट होती,डेव्हलपमेंट होती.
पूर्वायुष्यातले कटू, बोचरे, जिव्हारी लागलेले अनुभवही आज भूतकाळात गाडले गेले होते,जमीनदोस्त झाले होते.
आता होती फक्त......
रीडेव्हलपमेंट 
नव्या वास्तूची आणि नव्या नात्याचीसुद्धा....
समोरच्या बाकावर बसलेल्या जोश्यांशी चितळ्यांची नेत्रपल्लवी झाली आणि दोघेही मिस्किलपणे हसले!!!!!!!

@ योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

Sep 2, 2020

सुफळ संपूर्ण

                               श्री सरस्वती प्रसन्न

                                 सुफळ संपूर्ण
     
ताजा  कडक लॉकडाउन.
दिवसक्रमांक एकशे-छत्तीस.
सुनसान रस्ते,गायब झालेली वर्दळ! 
एखाद्या भयपटाचा अदृष्य थरार!
कोरोनाचा श्रावण-स्पेशल कहर!!
हा कसला श्रावण?
देव्हाऱ्यात  चिकटवलेला कागद!!
देऊळ बंद!!
शिवामूठ नाही,लघुरुद्र नाही
मंगळागौरी नाहीत
जिवतीची सवाष्ण सुद्धा नाही
ऑफिसात शुक्रवारची चणे नाहीत

गेल्याच आठवड्यात ऑफिसचा वॉचमन पॉझिटिव्ह निघाला

पुन्हा एकदा सगळ्यांना घरी बसवलय.

आज अगदी मस्ट वालं काम आलंय
त्यामुळे मोजून पाचजणींना 
ऑफिसचे खास निमंत्रण आहे.
 काय अडलंय तुझ्याशिवाय या घरच्यांच्या प्रश्नापुढे मी निरुत्तर!
एरवी जिथे शंभर लोकांचा वावर तिथे फक्त पाच लढवय्या!
कुणीकुणाशी बोलत नाही,मास्कधारी अबोला!
इतक्यात ती अवतरते!
हातात इन्शुरन्स पेपर्सचा मोठा गठ्ठा!
मला गळ घालते(की गाळात घालते?)
“मॅडम, सगळ्या रीकवायरमेन्ट पूर्ण केल्यात.माझे पेपर कम्प्लिट करून द्याल का?”
मी काम संपवायच्या घाईत.
आत्ता ही कुठे तडमडली?तेसुद्धा मोठा किचकट केसेसचा गठ्ठा घेऊन!
काही नडलय का जीव धोक्यात घालून इथे यायचं? कोविडच्या टेन्शनमध्ये अधिकच भर.

मृत्यूभीतीमुळे आलेली इन्शुरन्स-लाट
हिच्या हातातल्या गठ्ठ्यात पोचलेली!
घाबरलेली तमाम जनता! 

इन्शुरन्सएजंटला फोनवरून निमंत्रण.
कसेही करून या आणि इन्शुरन्स पेपर पूर्ण करून घ्या!

हिचे सगळे पेपर म्हणजे,कामाचा जास्तीचा एक तास प्लस जोखीम आणि टेंशन सुद्धा
नको झालंय ते टेन्शन मला. 
मी वातावरण सैल करते.
“काय स्मिता तुझी अस्मिता का झालीये?जरा हास की.”

माझा जोक अगदीच फालतू,
न हसणेबल  असतो.

माझ्या प्रत्येक फालतू जोकला आवर्जून हसणारी स्मिता आज मात्र उदासलेली!
मी तिला पुन्हा उचकवते “ए रेड झोन कशाला आलीस ग आम्हाला त्रास द्यायला?.गपचूप घरी बस ना”

आता मात्र तिच्या डोळ्यात श्रावण धारा,
मास्क असला तरी त्यावरचे डबडबले डोळे दिसतात मला!
“काय ग? काय झालं?”
ती नुसती मान हलवते.
“मॅडम माझे पेपर्स ….एकदा चेक तरी करा……”
मला तिला जास्त त्रास द्यावासा वाटत नाही
शेवटी पेपर घ्यायला माझे हात पुढे होतात.
ती सतर्क!!!!!!
चटकन बाजूच्या सॅनिटायझरचा अभिषेक पेपरवर करते 
आणि माझ्या हातावरही. 
गरीबघरची असली तरी डोक्याने तल्लख.
पेपर वर्क, मशीन वर्क सगळं उत्तम जाणते.
बड्या इन्शुरन्स एजंटचा उजवा हात.
त्याची ऑफिसातली सगळी कामं झटझट उरकते.
चेष्टा मस्करी तर अखंड ,
 पण आज हे काहीतरी वेगळंच,
नक्की काय झालंय हिला?

कोरोना स्पेसिफिक डिप्रेशन?

हल्ली जिथेतिथे डिप्रेशन आहे.
जीवनरस शोषून घेतलेली उदासी.

तिचा चेहेरा ओढलेला ,डोळ्याखाली अशक्त काजळी,
हातापायाच्या काड्या,सगळ्या दिशांनी खपाटलेलं शरीर.
“बोल बाई पटकन,”असं मी  मनात म्हणते
 आणि तिच्याकडचे पेपर्स चेक करते.
सगळे ओके असतात.

मी पेपर पाहताना ती माझ्याकडे एकटक पाहात असते.

तिला काही बोलायचंय का?

मला आता सगळा ताण असह्य होतो.

सकाळी टिव्हीने कोकलून दिलेल्या मृत्यूच्या बातम्या,
मग आलेला ऑफिसचा फोन,
घरातुन मी निघताना झालेली कटकट,
कोविड सरंजामासकट निघताना आलेलं मणामणाचं ओझं,
रस्त्यात पोलिसांची उलट तपासणी.
बंद ऑफिसमध्ये शिरल्यावर डोळ्याला टोचणारे अस्वच्छ कुबट कोपरे
 आणि आता ही बया. 

डबडबलेल्या डोळ्यांची!!!!!!!!

पेपर्स कम्प्लिट करून झाल्यावर मी त्या पेपरवर ओकेवाले शिक्के मारते.
 आणि तिला पुन्हा टोचते,
”ए रेड झोन,तू खडकीला राहतेस ना?
 रेड झोन डिक्लेअर झालाय ना?मग तू कशी आलीस?
त्रास नुसता,केवढं काम मला देऊन ठेवलंयस”
ती इतकी स्मार्ट,की
पेपर पूर्ण झाल्यावर 
मी हे वाक्य बोलतेय
 याची खात्री झाल्यावर, 
भळभळ बोलत सुटते!
“मॅडम सारखं सारखं रेड झोन नका म्हणू!
 इथल्या साहेबांनी ऐकलं तर मला इथे येऊ देणार नाहीत.
आणि मी ऑफिसला आले नाही तर आमच्या साहेबांचं काम कसं पूर्ण होणार?मला ऑफिसात यायला आवडतं!
 घरात सासू खूप त्रास देतेय ,घरी बसणं नको झालंय."

“अगं पण आत्ता तुझं इथे येणं धोक्याचं नाही का?एकतर पब्लिक ट्रान्सपोर्टने येतेस.”

“मॅडम,माझ्या साहेबांनी तिन्ही महिन्यांचा सगळा पगार दिला,
 त्याशिवाय सोनूच्या दहावीच्या क्लासची अर्धी फी सुद्धा दिली.
मग मी त्यांचं काम नको का पूर्ण करायला?”…….

“अग मुलीच्या फी चं तुझा नवरा काहीच नाही का ग बघत?”

“मॅडम,फी चं काय बोलताय?गेले तीन महिने घरखर्च सुद्धा सगळा मी एकटी करतेय.
 लॉकडाउन मध्ये घरी बसलाय तो.
त्याला कामावरून कमी केलंय.
सध्या फक्त टीव्ही पाहतो आणि मोबाइल हातात घेऊन बसलेला असतो.
सासू त्याला काही बोलत नाही ,पण राग माझ्यावर काढते
त्यांच्या तिघांच्या गप्पा चालतात आणि सतत खायला मात्र मागत असतात.”

खोल गेलेल्या आवाजात तिची  घरघरकी कहानी!!!

हे तर घरोघरी होतंच की,
सुशिक्षित घरातही हातावर हात घेऊन बसलेले,
घरकामात मदत न करणारे पुरुष होतेच.
पण म्हणून हिच्यासारखं कुणी खपाटीला नव्हतं गेलं.

उलट लॉकडाउन आम्हा सगळ्यांच्या अंगोपांगी  बहरला  होता.

माझी चेष्टा ”मग?काय काय खायला घातलंस नवऱ्याला ?
आणि तू अशी फिकुटलेली का ग?
त्यांच्यासाठी करतेस ते तू नाही का स्वतः खात? 
प्रतिकार शक्ती चांगली लागते माहिती आहे ना??
चांगली खातपीत जा बाई.हळद दूध वगैरे पी.”

“मॅडम,सकाळपासून झाड-लोट,
सगळ्यांचे कपडे हाती धुवायचे,
 भांड्यांचा ढिगारा घासायचा.
त्यानंतर नाश्ता आणि स्वैपाक!!!!

सगळं झाल्यावर  मी खायला बसले 
की सासू समोर येऊन बसते
माझ्या जेवणाच्या ताटाकडे पाहात बसते.

मग मला नाही जात जेवण.

ती समोर आली की मी अर्धवट खाऊन, तशीच उठते!!"
“सासू,कामाला जरा तरी मदत करते की नाही ग? 
अग तू एवढी राबराब राबतेस घरासाठी कमावतेस मग करावी की तिने थोडीतरी मदत.”

 या प्रश्नावरचं तिचं हसू
  रडण्यापेक्षा जास्त वेदनादायी असतं.

“उठल्यापासून बाजेवर बसते 
आणि सारखी बडबड करत राहाते.
घर तिच्या नावावर आहे ना.
कामाचं काय घेऊन बसलात,
तोंड बंद ठेवलं तरी पुष्कळ झालं.
मॅडम सोनूची दहावी आहे. शाळा,क्लास सगळा अभ्यास ऑनलाईन चालतो,
मग तुम्ही सांगा घरात शांतता नको का?

मला खूण करून म्हणाली “एक गंमत दाखवू का?उठा माझ्यासोबत जरा या पलीकडच्या हॉलपर्यंत”

मी मुकाट्याने तिच्यामागे चालत जाते.

पाहाते तो ऑफिसच्या त्या पूर्ण रिकाम्या असलेल्या हॉल मध्ये
 सोनूचा  ऑनलाइन क्लास  चाललेला असतो.
तिच्या  चेहेऱ्याचा मास्क अर्धवट खाली आलेला असतो,

बाजूला बाटलीत हळद दूध असतं,
सासूच्या नकळत आणलेलं!!

सोनूची त्वचा तुकतुकीत असते.
मशागत केलेल्या पिकासारखा चेहेरा टपोरलेला असतो.

ही बया पोरीला शांततेत अभ्यास करता यावा म्हणून तिला इथे रोज घेऊन येते?
प्रवासाचा रिस्कसुद्धा घेते?

स्वतः अर्धवट खाऊन पोरीला भरपेट जेवण देत असणार,हे दिसतच होतं.

“मी आणि सोनू एकच स्मार्टफोन वापरतो
इथे तिला शांतता मिळते 
आणि माझा फोनसुद्धा वापरता येतो
मॅडम दोन दोन स्मार्टफोन परवडत नाहीत हो”

सोनुकडे पाहताना तिच्या  डोळ्याला  जिवती पान्हा  फुटतो.

मला अचानक श्रावण-साक्षात्कार होतो

रात्री जेवताना,
माझा पहिलाच घास अडतो. 
तिचा शुष्क चेहेरा,करपलेलं शरीर 
आणि ओढलेले डोळे मला टोचायला लागतात.
माझी टर्न नसतानाही मी शुक्रवार मागून घेते. 
श्रावणी शुक्रवार
जिवतीचा शुक्रवार

पहाटे लवकर उठून केर,लाद्या,भांडी,
आणि पुरणाचा स्वैपाकसुद्धा शिजतो!!!

आज मी उपास करायचं ठरवलंय .

आदल्या दिवशी आणून ठेवलेल्या सामानाची पिशवी आणि पुरणाच्या साग्र-संगीत जेवणाचा डबा मी अदबशीरपणे भरून घेते.

सासुचे फोनवर जिवती-गॉसिप चालू असतं.
”लॉकडाउन मध्ये ऑफिसला जायचं काही नडलाय तरी का?आम्ही आमच्यावेळी आम्ही रजा घेऊन शुक्रवारची सवाष्ण घालायचो.
हल्ली मी बोलणं सोडून दिलंय. करा काय हवं ते………"
असलं काहीबाही कानावर पडत असतानाच,यशस्वी दुर्लक्ष करत मी बाहेर पडते.
हातपाय उपाशी लटलटत असतात,
हातात दोन वजनदार बॅग्स असतात.
पण मी एकदातरी तिचा-वाला अनुभव  घेणार असते.
उपाशीपोटी काम,अजिबात जाणीव न ठेवणाऱ्या सासूची कटकट,त्यानंतर ऑफिस!
सामान स्कुटरवर अडकवून मी स्टार्ट मारते.
वाटेत अडवणाऱ्या पोलिसाला आदराने माझं आयकार्ड दाखवते.
ऑफिसात त्या रिकाम्या हॉल मध्ये मी डोकावते.
आजही सोनूचा ऑनलाइन क्लास चालू असतो.
आणि बाजूच्या टेबलवर डोकं टेकवून,
तिचा अर्धपोटी थकला देह,  निद्राग्लानीमय झालेला असतो.
मी पिशवीतून ताट,वाटी,भांडं काढते,
पुरणपोळीच्या जेवणाचा सगळा श्रावणी सरंजाम मांडते,
ताटाभोवती रांगोळी,उदबत्ती,सगळा थाट उडवते.
तिला हळूच हलवून उठवते.
तिचे विस्मयाने उघडलेले डोळे, प्रेमाने भिजतात.
मी तिच्या हातात गजरा देते,कुंकू लावते आणि तिला जेवायला लावते.
त्यादिवशीची जिवतीची ओटी मी  मास्क,सॅनिटायझर,खजुर,राजगिरा
लाडू,चिक्की,सफरचंद  या सगळ्यानी भरते. 
आणि साडीच्या जागी सोनूच्याक्लासच्या उरलेल्या फीचं पाकीट तिच्या हातात कोंबते.आणि वाकून तिच्या पायाला हात लावून नमस्कार करते.

ती संकोचाने कशीनुशी होते
पण शेवटी लखलखीत हसते .
कोरोनात हरवलेला माझा श्रावण मला  या जिवतीच्या रुपात सापडलेला असतो.
साठा उत्तराची तिची जिवती कहाणी लॉक डाउन नगरीत सुफळ संपूर्ण होणार असते......

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

Sep 1, 2020

पुढच्या वर्षी वाजवूया

               श्री सरस्वती प्रसन्न
@योगिनी श्रीनिवास पाळंदे

          *पुढच्यावर्षी वाजवूया*

अभ्याला तालवाद्यांची आवड अगदी बालपणापासून!!
घरात डबे-डूबे,झाकणं, अगदी दरवाजासुद्धा बडवायचा!
तिथपासून ते शाळेत बाक बडवणे असा त्याचा बालपणाचा *ताल-प्रवास*
फ्री पिरिअडला तर त्याचा *बाकवादनाचा*
 स्वतंत्र कार्यक्रम चाले.
एकदा पालक सभेला “त्याच्या अंगात जास्तच ताकद आहे आणि तालाचं ज्ञानही चांगलं आहे, ते चॅनेलाइझ करा”अशी थोड्या *शुगर कोटेड* स्वरातली तक्रारच आली
मग तबल्याच्या क्लासची शोधाशोध.
क्लास सुरू.
सुरवातीला रमला.
मग त्या शिस्तीला आणि क्लासमध्ये *वही न्यायची* या कल्पनेला कंटाळून गेला.
हौसेने आणलेली तबल्याची जोडी माळ्यावरसुद्धा जाऊन बसली.
आणि एकदा गणेश विसर्जन मिरवणुकीत. 
सिटीपोस्ट चौकात,उधाणलेल्या लाखोंच्या समुदायापुढे,
 ध्वजधारकाने ध्वज उलगडला
क्षणात, त्यात मिटलेल्या पाकळ्यांचा शिडकावा झाला.
पांचजन्याचा मंगल ध्वनी उमटला!
आणि ढोल ताशा वादकांनी तोच क्षण पकडून,
*तालाच्या मात्रांवर स्वार होऊन कडकडाट केला.*
कानाच्या ओंजळीत न मावणारा तो वीरश्री-घुमारा,त्याच्या अगदी रोमारोमात घुसला.
त्याच्या अंगावरचा केसनकेस उभा राहिला.
ढोलताशांच्या त्या पथकाने धरती-गगनाला जोडणारा जणू *ध्वनी-सेतूच* उभारला होता.
समुदायातला प्रत्येक जण मंत्रावला होता!
तो सुद्धा त्यातलाच एक!!!!!!!!
पण विलक्षण बेचैन झालेला.
पथकात सामील व्हायचंच हे ठरवल्यावर कुठे त्याला त्या रात्री झोप लागली.
लास्ट ईयर, प्रॅक्टिकलस,एकीकडे चालू असलेली इंटर्नशीप,या भरगच्च शेड्युलमध्ये,तो विचार मात्र मनातून 
नाही गेला.
एका सामाजिक कार्यक्रमात त्याला *दादा* भेटला.
दादा त्यातला मास्टर!!!
ढोलताशा महासंघाचा प्रमुखच!!
 त्याने दादाला, पथकात सामील व्हायची तळमळ बोलून दाखवली.
झालं!! दादाने एका पथकात त्याचा शिरकावही करून दिला!!
आषाढ महिना!
वाद्यांच्या मरमद्दीचा हंगाम!!!!पथकातल्या जोडीदारासोबत तो कारागिरांच्या घरी गेला होता.
अक्षरशः एका झोपडीवजा बैठ्या घरात कारागिरांचे काम चालू होते
तिथेच त्याचं वाद्य त्याने बघितलं!!
एक *गुटगुटीत,बाळसेदार ढोल* होता तो,आणि त्यासोबतच्या टिपऱ्या.
 प्रेमातच पडला होता तो.
त्यावरून हात फिरवताना शहारला होता!!!
नदीपात्रात प्रॅक्टिस सुरू झाली.याला वाटलं तेवढं सोपं नव्हतं ते.
हात भरून यायचे.अनुभवी वादकांसोबत लयकारी जुळवताना फरफटायला व्हायचं!
पण तो हटला नाही.दीड महिना बेदम प्प्रॅक्टिस केली त्याने!!
सुरवातीला बोटं सोलवटायची,मनगट सुजायची!
कंबरेला ढोलाच्या बांधपट्टीचा एक लालकाळा विळखा पडायचा!!
पण ते सगळं खूप आवडतं होतं!
तीन आठवड्यात तो सेट झाला.

कॉलेजमित्रांच्या ग्रुपमध्ये मात्र कुणाला त्याने पत्ता लागू नव्हता दिला.
प्रत्येक रविवारी कॉफीच्या प्लॅन मधून तो कलटी मारत होता.
कुणीतरी पचकला “काय रे,कुठे जातोस प्रत्येक रविवारी…..कोण भेटली आहे?? ?”
दुसरा डोळे मिचकावत म्हणाला
”मी याला बघितलंय नदीपात्राच्या दिशेने जाताना.तिथेच आहे की काय तुझा *मिटिंग स्पॉट?*
“ साल्या बोल ना,कोण आहे ती?”   
त्यासर्वाना उडवाउडवीची उत्तरं दिली होती.कारण त्या सर्वानाच थेट गणपतीत सरप्राईज द्यायचं त्याने ठरवलेलं होतं.
जेवताना त्याने चमचा घेतला तेव्हा,
“चिरंजीव,आपण बोटांनी जेवतो, फिरंग्यांसारखं चमच्याने नव्हे”
असं पिताश्रीनी सुनावलं,तिथेही त्याने वेळ मारून नेली!
माताजींच्या नजरेतून मात्र सोलवटलेली बोटं सुटली नव्हती.
त्यांनी जेवणानंतर रात्री एकट्याला गाठून छडा लावला...…
“हात्तीच्या,ढोल ताशा पथकात जातोयस का?मग चांगलंच आहे की,त्यात लपवायचंय काय”
“अग आई,पण मी पथकात जातो हे बाबांना नको सांगू,उगाच काही उलटसुलट बोलतील आणि मग आमचे वाद होतील."
माताजींना विश्वासात घेऊन भगव्या रंगाच्या सुरवार झब्ब्याच्या चार सेट्सची खरेदी झाली.
प्रॅक्टिस आता रंगात आल्या होत्या.
क्वचित कधी पावसामुळे खंड पडायची वेळ आली तर कुठल्या कुठल्या आडोश्याच्या जागासुद्धा
 मंडळींनी शोधून ठेवल्या होत्या.

मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत वाजवायचं आमंत्रण पथकाला आलं.
अभ्या नखशिखान्त हरखला होता!!!
दिवस क्रमांक एक!!!!!!
वीस ढोल ,चार ताशा,एक पांचजन्य आणि ध्वज धारक
*श्रींचा पुष्पभारी रथ*
*तापलेली बोटं*
*धुंदावलेलं मन*
*नादावलेले जन*
*उधळलेला गुलाल*
*थिरकणारी पावलं*,बेभान समुदाय,
हवेत पसरलेला जादुई नादकल्लोळ,
*अवघा रंग एक झाला*
दहादिवस अभ्या अस्मान आनंदात!!!
बेभान वाजवत होता.असं वाजवत होता जणू त्यासाठीच तो जन्मला होता.
 *अनंत चतुर्दशीला छत्तीस तासांची मिरवणूक आणि सगळ्या शारीर जाणिवांपलीकडे नेणारा नादानुभव!*
शेवटच्या दिवशी घरी आलेल्या अभ्याचं *घर्मगुलाली* ध्यान पाहून
 आईने पहिली दृष्ट काढली आणि नंतर त्याला
अक्षरशः बाथरूममध्ये ढकलला.
अंगावरून निथळणाऱ्या गुलालपाण्याकडे तो कौतुकाने पाहात होता
स्वतःच्याच प्रेमात पडला होता.
आंघोळीनंतर जी *नादग्लानी* आली ती वर्णनातीत होती.
दुसऱ्यादिवशी जाग आल्यावर तो उदास उदास होता.
आता थेट पुढच्यावर्षी??
छे छे हे बरोबर नाही
दुसरं काहीच निमित्त असू नये पथकाच्या वादनासाठी?
*तो* ...जे वांच्छिल ते ते …..
आणि...दादाचा फोन आला
पितृपंधरवड्ड्यात एका वृद्धाश्रमात वाजवायचे होते.
अरे काय तिथला अनुभव होता.
सगळे म्हातारे डुलत काय होते,
टाळ्या काय वाजवत होते
काही तर वय विसरून नाचले सुद्धा.
मग काय ही पोरं सुद्धा कुठले कुठले *नवे पॅटर्न* काढून वाजवत होती!
त्यानंतरची दिवाळी,
दादाचा फोन ”काय,वाजवायचंय ना अजून? की फिटली हौस?"
“दादा,तू फक्त *कुठे* ते बोल?”
“भाऊबीजेनंतर पहिला रविवार येतो तेव्हा जायचंय आपल्याला.”
“दादा,नक्की येतो पण जायचंय कुठे?”
दादा *कोड्यात* हसत म्हणाला”ते तुला काय करायचंय? तुझं वाद्य घेऊन सकाळी आठला तयार रहा.
आणि हो, तू मार्केट यार्डच्या जवळ राहतोस ना? मग तिथून चाफ्याची शंभर फुलं घेऊन ये सोबत.”

रविवारी अभयशेठ लवकर उठून,
दादाच्या सूचनेनुसार ढोल आणि फुलं घेऊन निघाले.
मनात विचार करत होता”साला, हे कसलं कॉम्बिनेशन आहे. *पिवळ्या चाफ्याची फुलं आणि ढोल ताशा?*

एक मिनीबस बोलावली होती दादाने.
काहीजणांकडे पेढे आणि काहीजणांकडे चक्क *ओवाळणीचं सामान!!!!*
सगळं पथक बुचकळ्यात!!!!!!
नक्की ह्याच्या मनात तरी काय आहे?
बस,खडकीच्या *अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात* जाऊन थांबली
 तेव्हा कुठे पोरांच्या डोक्यात प्रकाश पडला.
देशासाठी लढताना,कंबरेखाली अपंगत्व आलेले जिगरबाज वीर!
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या युद्ध कहाण्या!
सगळे चाकाच्या खुर्च्यांवर.
*अपंग पण हतबल नव्हेत!!*
सगळ्यांना गोलाकार बसवलं , 
पथकातल्या पोरांनीच त्या सर्वांना चाफ्याची फुलं दिली
त्यांनतर  वादन सुरू!!!!!!
समोर साक्षात *रणदेवतेचे सुपुत्र*
ढोलांतून ठासून भरलेल्या वीररसाचे घुमारे उठत होते
ताशा विजेसारखा कडाडत होता!
बेभान झालेले वादक!!!
त्याहूनही बेभान झालेले सोल्जर्स!!!
व्हीलचेयर गरागरा फिरवत होते,
टाळ्या वाजवत होते.हवेतल्या हवेत बेफाम नाचत होते.
शेवटी पोरांनी केलेलं औक्षण 
आणि भरवलेला पेढ्याचा घास 
सगळ्यांचे *भिजलेले डोळे*
अभ्याने दादाला कडकडून मिठी मारली
दादा यु आर ग्रेट!!
पथकाला *समाजभानाची* किती सुंदर वाट आखून दिलीस तू!!!
वेगळ्याच उंचीवर गेलेला अनुभव होता तो
अशी बेभान सात वर्षे…..........
शिक्षण,नोकरी,रोजचे व्यवहार यासारख्या बेचव आयुष्यापेक्षा
 अभ्या फक्त या असल्या गोष्टींसाठी जगत असे.
मार्चमध्ये लॉक डाउन लागला तेव्हा *किती महिने*?हा अंदाजच आला नव्हता
म्हणून तर अभ्या पहिले दोन महिने शांत होता
जून पर्यंत सगळं आलबेल होईल अशा बातम्या होत्या
पण एकेदिवशी एका चॅनेलचर्चेत गणेशोत्सव विषय आला.
आणि सगळं चित्रच स्पष्ट झालं
यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव नाही,मांडव नाहीत,गर्दी नाही
आणि अर्थातच ढोल ताशा पथकेही नाहीत
डोकच सटकलं होतं त्याचं!!
त्या दोन दिवसात दादाला तीस मेसेज केले अभ्याने.
मनात बेचैनी धुमसत होती.
पथकात तीच चर्चा!!!!
शेवटी एक झूम कॉल घेतला दादाने.
कुणाकुणाच्या कितीकिती कल्पना.
डिस्टन्स पाळू, मोकळ्या मैदानात वाजवू ,नाहीतर नदीपात्रात
वाजवूया पण गणपतीत वाजवायचंच!!
कुणी  म्हणाले हॉस्पिटल समोर वैद्यकियसेवा देणाऱ्यांना
*धन्यवादाची मानवंदना* म्हणून तरी वाजवू.पण वादनात खंड नको.

सर्वांचं ऐकून शेवटी दादाने कडक शब्दात, निर्वाणीचा समारोप केला....
" *यावर्षी वादन जमणे नाही*.
पुढच्या वर्षी सगळं पूर्ववत झालं की वाजवायचंच आहे की.
तुम्ही जर रस्त्यावर उतरलात तर तुम्हाला पाहून पाच पन्नास लोकं खाली उतरतील आणि सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडेल.
दहा दिवस वाजवायला मिळणार नाही म्हणून उदास आहात ना?
पण काय रे या दहा दिवसावर ज्या गरिबांचं वर्षभराचं पोट अवलंबून आहे,त्यांची  आयुष्य उध्वस्त झालीत त्यांचा विचार तरी आला का तुमच्या मनात?" दादा कधी नव्हे ते चिडलेला.
कॉल संपला.
अभ्या खट्टू झाला , एकीकडे आपण फक्त स्वतःचाच विचार केला याची लाजही वाटली त्याला.
पण तरीही त्याचं रक्त सळसळत होतंच.........
दादाच्या विरोधात जायचा प्रश्नच नव्हता तरीही…....
या उसळणाऱ्या रक्ताचं काय करू?असा विचार मनात आला आणि तो क्षणच *दृष्टांताचा* होता!!
वादनासाठी उसळणारं हे रक्त जर कुणाचं रुदन थांबवू शकलं तर!!!!!

 पथकातल्या एकाची पॅथलॅब आहे,त्याने घेतलीय सगळी जबाबदारी.
शहरातली सगळी पथकं एकत्र आहेत.
मोठा हॉल,सगळी वैद्यकीय सुसज्जता
हॉलमध्ये  मानाच्या गणपतीची भव्य तसबीरसुद्धा ठेवायचं ठरलंय.
तरी सगळयांच्या मनात बेचैनी....
अभ्या तर एकदा *त्याचं वाद्य* बघायलाही गेला होता !!!!
बिचारं, *क्वांरन्टाइन* झालं होतं.
त्याची *मरम्मद* झाली नाही यावर्षी,
त्याची पान,दोऱ्या बदलल्या नव्हत्या,
त्यावरून प्रेमाचा,दुरुस्तीचा हातही फिरला नव्हता
अगदी त्याच क्षणी त्याला आठवले,
 *ते सगळे कारागीर*,जे या मोसमात वाद्याच्या देखभालीसाठी
अहोरात्र कामात बुडायचे.
त्यांचं पोटच होतं या व्यवसायावर!!
मुळातच गरिबीशी झुंजणारे ते,
त्यांनी काय केलं असेल गेल्या चार महिन्यात?
त्यांची अक्षरशः उपासमार झाली असेल.
छे छे छे............
काहीतरी करायलाच हवंय!!!!!
ढोलावरून हात फिरवताना अभ्याच्या मनातल्या *प्रकाश वाटा* उजळल्या.

आज  *अनंतचतुर्दशी* आहे
ओकेबोके रस्ते
सुनसान गल्ल्या
थांबलेली वर्दळ
उदासलेलं मन
शिवशिवणारी बोटं
बंदिस्त गुलाल
स्पर्शप्रतीक्षेत ढोल ताशे,
आणि स्थितप्रज्ञ गणराय!!!!
पण................

डिस्टनसिंग चे नियम पाळून, कडक शिस्तीत,पोरांनी मात्र आजचा दिवस साधून रक्तदानाचं शिबीर ठरवलंय......
खास कोविड काळात घेतलेलं, 
एका मोठ्या हॉस्पिटलची रक्ताची गरज पुरवणारं!!!
ढोल वाजवताना तापलेलं,उसळणारं रक्त आज *बाटलीबंद* होतंय,
 विघ्नांचे हरण करण्यासाठी!!!!!!

दादाच्या हस्ते उदघाटन!!!

पण एक *सरप्राईज* बाकी आहे.

शिबिर समारोपाच्या वेळी एक टेम्पो भरून पोती उतरवली जाताहेत.
पोरं भराभरा ती पोती अदबशीरपणे 
लावून ठेवताहेत आणि......
पंधरा *कारागीरांचा* हॉलमध्ये प्रवेश होतो.
सगळे *चर्मवाद्य कारागीर*,मास्क लावून,अंतर ठेवून उभे आहेत,दादाला रामराम करतायत!
*दादा विस्मयचकित!!!!!!*
ह्या पोरांनी नक्की काय आरंभलंय??
पाचशे बाटल्यांचा रक्त संकलनासोबत वाद्य कारागिरांना चार महिन्यांच्या शिध्याचे धान्यवाटप!!
 त्यासोबत  *पुढच्यावर्षीच्या बिदागीचे*  ऍडव्हान्स पाकिटही!
कारागिरांच्या चेहेऱ्यावर संकोचभरली कृतज्ञता!!!
 तैलचित्रातला *स्थितप्रज्ञ गजानन*  आता मात्र प्रसन्न हसतोय......
पथकातल्या,पांचजन्याच्या मंगलध्वनी ऐकल्यावर हसायचा ना,थेट तस्साच!!
*आणि दादा???*
 आश्वस्त मनानी
 हसऱ्या ओठांनी
भरल्या डोळ्यांनी
गगनभेदी *गणेशगर्जना* करतोय 
 गणपती बाप्पा मोरया
*पुढच्या वर्षी वाजवूया*
 गणपती बाप्पा मोरया
*पुढच्या वर्षी वाजवूया*

@योगिनी श्रीनिवास पाळंदे,
    पुणे








.